दिल्ली पोलिसांना फटकारणाऱ्या न्यायमूर्तींची बदली, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

| Updated on: Feb 27, 2020 | 11:25 AM

दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती एस मुरलीधर (Justice Muralidhar transfer) यांच्या अचानक बदलीने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

दिल्ली पोलिसांना फटकारणाऱ्या न्यायमूर्तींची बदली, काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल
Follow us on

नवी दिल्ली : दिल्ली हायकोर्टातील न्यायमूर्ती एस मुरलीधर (Justice Muralidhar transfer) यांच्या अचानक बदलीने उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. न्यायमूर्ती एस मुरलीधर यांनी दिल्लीतील हिंसाचाराप्रकरणी बुधवारी झालेल्या महत्वाच्या सुनावणीवेळी दिल्ली पोलिसांना फटकारलं होतं. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली झाल्याने विरोधकांकडून मोदी सरकारवर आरोप केले जात आहेत. (Justice Muralidhar transfer)

न्यायमूर्ती मुरलीधर यांची बदली पंजाब आणि हायकोर्टाचे न्यायमूर्तीपदी करण्यात आली आहे. मुरलीधर यांनी दिल्ली हिंसाचाराची सुनावणी गुरुवारपर्यंत स्थगित केली होती. त्यानंतर ही सुनावणी मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंठपीठाकडे सोपवण्यात आली.

राष्ट्रपती भवनातून अधिसूचना जारी

न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीची अधिसूचना राष्ट्रपती भवनातून जारी झाली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारताचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर, न्यायमूर्ती मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात करण्यात आली.

12 फेब्रुवारीलाच बदलीचा निर्णय

दरम्यान, न्यायमूर्ती मुरलीधर यांच्या बदलीचा निर्णय हा काल किंवा आज झालेला नाही तर 12 फेब्रुवारीलाच झाल्याची माहिती मिळत आहे. न्यायमूर्तींची बदली ही सुप्रीम कोर्टाचे 5 ज्येष्ठ न्यायमूर्तींचं कॉलेजियम करत असतं. या कॉलेजियमने 12 फेब्रुवारीलाच मुरलीधर यांच्या बदलीची शिफारस करण्यात आली होती.

हायकोर्टाने पोलिसांना फटकारलं

दिल्ली हिंसाचारावर सुनावणी करताना हायकोर्टाने कडक ताशेरे ओढत दिल्ली पोलिसांना फटकारलं होतं. दिल्लीमध्ये दुसरा 1984 ची घटना होऊ देणार नाही , असं कोर्टाने म्हटलं होतं.

काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

दरम्यान, या बदलीनंतर काँग्रेसने  मोदी सरकारवर हल्ला चढवला. काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विट करत, “न्यायमूर्ती मुरलीधर यांची मध्यरात्री बदली हे सध्याचं सरकार पाहता आश्चर्यकारक नाही. मात्र निश्चितच हे दु:खद आणि लाजीरवाणं आहे. कोट्यवधी भारतीयांचा न्यायपालिकेवर विश्वास आहे. हा विश्वासघात करणे आणि न्यायपालिका पायदळी तुडवणे हे निंदनीय आहे” असं म्हटलं.

राहुल गांधींकडू न्यायमूर्ती लोयांची आठवण

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना, न्यायमूर्ती लोयांची आठवण काढली. “बहादूर न्यायमूर्ती लोया यांची आठवण येते, ज्यांची बदली केली नव्हती”, असं राहुल गांधी म्हणाले.