कर्नाटक विधानसभेचं कामकाज स्थगित, भाजपचे आमदार रात्रभर सभागृहातच झोपणार

| Updated on: Jul 18, 2019 | 7:11 PM

भाजपने रात्रभर सभागृहातच झोपण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात विधानसभेतच धरणं दिलं जाणार असल्याचं भाजपचे कर्नाटक प्रमुख बीएस येदियुरप्पा यांनी सांगितलं. शिवाय राहण्याची व्यवस्था केली जाईल, असंही ते म्हणाले.

कर्नाटक विधानसभेचं कामकाज स्थगित, भाजपचे आमदार रात्रभर सभागृहातच झोपणार
Follow us on

बंगळुरु : कर्नाटकातील कुमारस्वामी सरकार अडचणीत आलंय. बहुमत चाचणी ठरावावर दिवसभर चर्चा झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी अचानक सभागृहाचं कामकाज शुक्रवार सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित केलं, ज्यामुळे बहुमत चाचणी होऊ शकली नाही. भाजपने रात्रभर सभागृहातच झोपण्याचा निर्णय घेतलाय. विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात विधानसभेतच धरणं दिलं जाणार असल्याचं भाजपचे कर्नाटक प्रमुख बीएस येदियुरप्पा यांनी सांगितलं. शिवाय राहण्याची व्यवस्था केली जाईल, असंही ते म्हणाले.

भाजपने आमदारांना पळवलं असल्याचा आरोप करत दिवसभर सभागृहात आरोप-प्रत्यारोप झाले. जेडीएस आणि काँग्रेसकडून बहुमत चाचणीसाठी जाणिवपूर्वक उशिर केला जात असल्याचा आरोप भाजपने केला आणि राज्यपालांची भेटही घेतली. भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना पत्र दिल्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आजच बहुमत चाचणी घ्यावी, अशी इच्छाही राज्यपालांनी व्यक्त केली. पण राज्यपालांनी सभागृहाच्या कामकाजात हस्तक्षेप केल्याचा आरोप काँग्रेस-जेडीएसच्या आमदारांनी केला.

सभागृहातच खाण्याची-झोपण्याची व्यवस्था

बहुमत चाचणी होईपर्यंत सभागृह सोडणार नाही, अशी भूमिका भाजपच्या आमदारांनी घेतली आहे. महिला आमदार रात्री 9 वाजेपर्यंत सभागृहात थांबतील, त्यानंतर सर्व पुरुष आमदार सभागृहातच झोपतील, असं येदियुरप्पा यांनी सांगितलं. आमदारांच्या खाण्याची आणि झोपण्याची व्यवस्था सभागृहातच केली जाईल, असंही ते म्हणाले.

काँग्रेस आमदाराच्या अपहरणाची तक्रार

काँग्रेसचे आमदार श्रीधर पाटील मुंबईत उपचार घेत आहेत. पण आमदार पाटील यांचं भाजपकडून अपहरण करण्यात आल्याची तक्रार काँग्रेसने दिली आहे. विशेष म्हणजे श्रीधर पाटील यांचे रुग्णालयातील फोटोही सभागृहात दाखवण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी या प्रकरणाचा अहवाल उद्यापर्यंत देण्याचे आदेश गृहमंत्र्यांना दिले.

कर्नाटक विधानसभेतील पक्षीय बलाबल

कर्नाटक विधानसभेचं एकूण संख्याबळ 224 आहे. विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी काँग्रेस आणि जेडीएसच्या 15 आमदारांची गैरहजेरी असल्यास संख्याबळ 209 वर येईल. यानुसार बहुमताचा आकडा 105 पर्यंत येतो, जो भाजपला स्पष्टपणे बहुमत मिळवून देईल. कारण, भाजपकडे सध्या स्वतःचे 105 आमदार आहेत, तर एका अपक्षाचंही समर्थन मिळालंय. केपीजेपीचाही आमदार भाजपला समर्थन देत असल्यामुळे एकूण संख्याबळ 107 होतं, जे बहुमतापेक्षा जास्त आहे. तर दुसरीकडे विश्वासदर्शक ठरावात कुमारस्वामी बहुमत सिद्ध न करु शकल्यास भाजपचं सरकार येणं निश्चित आहे.

15 आमदार गैरहजर राहिल्यानंतरचं समीकरण

एकूण आमदार – 224

गैरहजर आमदार – 15

गैरहजेरीनंतरची एकूण संख्या – 209

बहुमत – 105

भाजप – 105

अपक्ष – 1 (भाजपला पाठिंबा)

केपीजेपी – 1 (भाजपला पाठिंबा)

भाजप+ 107

काँग्रेस-जेडीएस

कांग्रेस – 66 (विधानसभा अध्यक्षांसहित)

जेडीएस – 34

बसपा – 1

एकूण – 101