आजीचा राजकीय वारसा, सख्ख्या बहिणीविरोधात निवडणूक लढल्या; वाचा, यशोमती ठाकूर यांचा राजकीय संघर्ष

| Updated on: May 19, 2021 | 6:19 PM

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या काँग्रेसच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या फायर ब्रँड नेत्या आहेत. (know about Yashomati Thakur, the firebrand Congress leader)

आजीचा राजकीय वारसा, सख्ख्या बहिणीविरोधात निवडणूक लढल्या; वाचा, यशोमती ठाकूर यांचा राजकीय संघर्ष
Yashomati Thakur
Follow us on

मुंबई: महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर या काँग्रेसच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या फायर ब्रँड नेत्या आहेत. अभ्यासू आणि स्त्रियांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या नेत्या म्हणूनही त्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या आजीकडून त्यांना राजकीय वारसा मिळाला आहे. त्यांचे वडीलही दोनदा आमदार होते. त्यामुळे घरात राजकीय वातावरणातच त्यांची जडणघडण झाली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (know about Yashomati Thakur, the firebrand Congress leader)

नेमबाजीत सुवर्णपदक

यशोमती ठाकूर या तिवसा तालुक्यातील गुरुकुंज मोजरी येथील रहिवासी आहेत. त्या बीए, एलएलबी झालेल्या आहेत. मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. त्या उत्कृष्ट नेमबाज आहेत. त्यांना नेमबाजीत 1989मध्ये ड्युक ऑफ एडनबर्गचे ब्राँझ पदक मिळालं आहे. तर 1993मध्ये ऑल इंडिया एनसीसीच्या बेसिक लीडरशीप कॅम्पमध्ये त्यांना नेमबाजीत सुवर्णपदक मिळालं आहे.

वडील आमदार, आजी जिल्हा परिषद सदस्या

यशोमती ठाकूर यांचे वडील भैय्यासाहेब ऊर्फ चंद्रकांत ठाकूर हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ते तिवसा मतदारसंघातून दोनदा निवडून आले होते. तर, यशोमती ठाकूर यांच्या आजीही जिल्हा परिषद सदस्य होत्या. त्यामुळे राजकारणाचं बाळकडू त्यांना घरातूनच मिळालं आहे.

राजकीय, सामाजिक कार्य

यशोमती ठाकूर यांनी युवक काँग्रेसमधून राजकारणाला सुरुवात केली. त्या 2004-2009 दरम्यान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव होत्या. त्यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी गुजरात, दीव-दमण, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या निरीक्षक म्हणून काम पाहिलं आहे. त्याच बरोबर मतदारसंघातील समस्या, महिलांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठ मोठी आंदोलने उभारली आहेत. रुक्मिणीचे माहेर असलेल्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूरचा विकास करून कार्तिकी एकादशीला त्यांनी शासकीय पूजा सुरू केली. संत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबांच्या कर्मभूमी आणि निर्वाणभूमीचा त्यांनी विकास केला आहे.

मोदी लाटेत मतदारसंघ राखला

यशोमती ठाकूर या अमरावतीतील तिवसा मतदारसंघातून तीनदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. विशेष म्हणजे मोदी लाटेतही 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अभ्यासू आणि आक्रमक आमदार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांनी विधानसभेतही आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवला आहे. 2009मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या होत्या. त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती. मात्र ठाकूर यांची आमदार म्हणून पहिलीच टर्म असल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं.

सख्ख्या बहिणीविरुद्ध लढत

2014ची विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी अत्यंत तापदायक ठरली. एक तर मोदी लाट आणि दुसरं म्हणजे सख्ख्या बहिणीविरोधातच असलेली लढत. त्यामुळे मत विभागणी होऊन तिसऱ्याचा फायदा होण्याची भिती त्यांना होती. शिवाय मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार याचीही धाकधूक वाटत होती. मात्र, त्यातही त्या बाजी मारून गेल्या आणि त्यांनी ही निवडणूक जिंकली. त्यामुळे पक्षातील त्यांचं वजनही वाढलं. ठाकूर या निवडून येताच पक्षश्रेष्ठींनी त्यांना मेघालय आणि कर्नाटकाच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रभारी म्हणून नियुक्त केलं. तसेच अखिल भारतीय काँग्रेसमध्ये सचिवपदही देण्यात आलं. त्यानिमित्ताने त्यांचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाचीही जबाबदारी देण्यात आली.

पोलीस मारहाणप्रकरणी शिक्षा

आठ वर्षापूर्वी एका पोलिसाला मारहाण केल्याच्या प्रकरणात अमरावती सत्र न्यायालयाने ठाकूर यांना तीन महिन्याची शिक्षा सुनावली होती. तसेच त्यांना 15 हजार 500 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता. याप्रकरणात त्यांच्या कारचालकासह दोन कार्यकर्त्यांनाही दोषी ठरवण्यात आलं होतं. तसेच या प्रकरणात खोटी साक्ष दिल्याप्रकरणी एका पोलिसालाही शिक्षा सुनावली होती. आठ वर्षापूर्वी म्हणजे 24 मार्च 2021 रोजी ठाकूर यांनी अमरावतीत अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे नावाच्या एका पोलिसाला मारहाण केली होती.

खिसे भरणं बाकी

ठाकूर नेहमी या ना त्या कारणाने चर्चेत राहिल्या आहेत. जानेवारी 2020मध्ये त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. पूर्वी आमचं सरकार नव्हतं. आता आम्ही शपथ घेतली आहे. परंतु अजून खिसे भरणं बाकी आहे, असं वक्तव्य त्यांनी एका जाहीर सभेत केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली होती. जे लोक विरोधात आहे, त्यांचा खिसा खोल आहे. ते लोक तुमच्या दारात आले आणि मत मागताना त्यांनी खिसा खाली केला तर नाही नका म्हणू. घरी येणाऱ्या लक्ष्मीला कोणी नकार देतं का? पण मतं मात्र काँग्रेसलाच द्या, असंही त्या म्हणाल्या होत्या. तर, गायीवरून हात फिरवल्यास नकारात्मकता निघून जाते, असं अजब विधानही त्यांनी केलं होतं. (know about Yashomati Thakur, the firebrand Congress leader)

 

संबंधित बातम्या:

अमरिशभाई पटेल यांना ‘ज्वेल्स ऑफ इंडिया’ का म्हणतात?; वाचा, सविस्तर

वडिलांबरोबर अयोध्येत कारसेवा, सव्वाशेपेक्षा अधिक आंदोलने; जाणून घ्या संघर्षशील नेत्या मनिषा कायंदेंबद्दल!

वडिलांचं निधनामुळे मायदेशी यावं लागलं आणि राजकारणात एन्ट्री झाली; वाचा जयंत पाटलांची ‘राज’नीती!

(know about Yashomati Thakur, the firebrand Congress leader)