‘…तर टक्कल करुन फिरेन’, मनसेच्या अविनाश जाधव यांचं विनायक राऊत यांना चॅलेंज
मनसे नेते अविनाश जाधव यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "विनायक राऊत अडीच लाख मतांनी जिंकून आले तर मी टक्कल करुन फिरेन", असं अविनाश जाधव म्हणाले आहेत. मनसेची टीम कोकणात दाखल झाली आहे. मनसेचे नेते कोकणात नारायण राणे यांचा प्रचार करणार आहेत.
महायुतीच्या प्रचारात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे नेतेमंडळी देखील सहभागी होत आहेत. मनसे नेत्यांकडून आता विरोधकांवर निशाणा साधला जातोय. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यावर अतिशय खोचक शब्दांत टीका केली आहे. विनायक राऊत अडीच लाखांनी जिंकून आले तर आपण टक्कल करुन फिरू, अशीदेखील मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. विनायक राऊत हे गेल्या 10 वर्षांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. यावेळी त्यांना भाजपचे उमेदवार नारायण राणे यांचं कडवं आव्हान आहे. नारायण राणे यांच्या प्रचारासाठी आता मनसे देखील कोकणात उतरली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरेंची आज रत्नागिरीत सभा आयोजि करण्यात आली. दुसरीकडे भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्यासाठी मनसे पक्ष देखील मैदानात उतरला आहे. मनसेकडूनही रत्नागिरीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेसाठी मनसे नेते बाळा नांदगावर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नारायण राणेंच्या प्रचारासाठी मनसेची कोकणात प्रचारसभा पार पडत आहे.
अविनाश जाधव नेमकं काय म्हणाले?
“नारायण राणे यांना बहुमताने निवडून आणायचं हा एक विचार आमच्या मनात आहेच, पण त्यासोबत शिवसेनेचे जे काही नाचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत भुंकतात ना, त्यांना पाडण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत”, अशी टीका अविनाश जाधव यांनी केली. यावेळी अविनाश जाधव यांना खासदार विनायक राऊत यांच्या विजयाच्या दाव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. आपला अडीच लाख विजयांनी विजय होणार, असा दावा विनायक राऊतांनी केलाय. त्यावर अविनाश जाधव यांनी टीका केली आहे.
“रात्री साडेसहा वाजेनंतर भिंत चाचपडत जाणारा माणूस अडीच लाख मतांनी कसा निवडून येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवावर निवडून येणारी ही लोकं. या विनायक राऊतांना ते राहतात तिथे त्यांना कोण विचारत नाहीत. ते कुठे अडीच लाख मतांनी निवडून येणार? विनायक राऊत अडीच लाख मतांनी निवडून आले तर मी टक्कल करुन फिरेन”, अशी टीका अविनाथ जाधव यांनी केली.
संदीप देशपांडे नेमकं काय म्हणाले?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीदेखील विनायक राऊत यांच्यावर निशाणा साधला. “राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर केला तेव्हा बऱ्याच लोकांची पायाखालची जमीन सरकली. त्यामुळे अनेक लोकं भुंकायला लागलेली आहेत. या भुंकणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्यायचीच आहेत. ते आम्ही दाखवून देणार”, असा इशारा संदीप देशपांडे यांनी दिला.