Nana Patole : सर्वात मोठी बातमी! तातडीने अधिवेशन बोलवा, राजकीय तमाशा थांबवा; नाना पटोलेंचं राज्यपालांना आवाहन

| Updated on: Jun 27, 2022 | 1:41 PM

Nana Patole : राज्यातील राजकीय परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे. हे आता उघड झालं आहे. राज्यातील जनतेच्याही हे लक्षात आलं आहे. आमच्यासोबत महाशक्ती आहे, असं एकनाथ शिंदे सांगत आहेत.

Nana Patole : सर्वात मोठी बातमी! तातडीने अधिवेशन बोलवा, राजकीय तमाशा थांबवा; नाना पटोलेंचं राज्यपालांना आवाहन
कॉंग्रेस नेते नाना पटोले
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यात गेल्या आठ दिवसांपासून राज्यात राजकीय अस्थिरतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे (congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं विधान केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तातडीने विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे. राज्यातील राजकीय तमाशा थांबवला पाहिजे, असं आवाहन नाना पटोले (nana patole) यांनी केलं आहे. राज्यपाल कार्यालयाचा विरोधक कसा वापर करतात याचं उत्तर द्यावे. नियमाप्रमाणे काम सुरू आहे त्यावर आक्षेप घेत असतील तर त्यांना लोकशाही मान्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे. गुवाहटीतील हॉटेलमध्ये 200 खोल्या बुक केल्याचं ऐकलं आहे. चार्टर्ड फ्लाईटने हे आमदार रात्री फिरतात याची ईडी चौकशी का करत नाही? बंडखोर आमदारांवर 3 हजार कोटी रुपये खर्च केला जात आहे. याची चौकशी आता ईडी (ED) का करत नाही?, असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

राज्यातील राजकीय परिस्थितीला भाजपच जबाबदार आहे. हे आता उघड झालं आहे. राज्यातील जनतेच्याही हे लक्षात आलं आहे. आमच्यासोबत महाशक्ती आहे, असं एकनाथ शिंदे सांगत आहेत. त्यामुळे ही महाशक्ती कुठली आहे हे लपून राहिलेले नाही. जर बंडखोर आमदार मतदारांना धमकावत असतील तर हे फार गंभीर आहे. त्यावर त्वरीत कार्यवाही झाली पाहिजे, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

लोकशाहीचा खून करण्याचा प्रयत्न

राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांची भूमिका महत्त्वाची होती. पण ते कशाची वाट बघत आहेत? हा प्रश्न आहे. विधानसभेत प्रक्रिया व्हायला पाहिजे. लोकशाहीचा खून करण्याचा केंद्राचा प्रयत्न होत आहे. राज्याचे तुकडे केंद्र सरकार करत आहे, असं ते म्हणाले.

ईडी कुठे आहे?

बंडखोर आमदारांवर 3 हजार कोटींचा खर्च केला जात असल्याचं मी मीडियातून ऐकलं आहे. एका एका बंडखोर आमदाराला 50 कोटी रुपये दिले जात आहेत. यामागे कोण आहे. याची चौकशी का केली जात नाही. ईडी कुठे आहे? असा सवाल पटोले यांनी केला आहे.

सत्तेसाठीचा तमाशा थांबवा

भाजपात प्रवेश केला की साऱ्या पापातून मुक्त होतो असे चित्र निर्माण झालेले आहे. राज्यपालांनी भूमिका घ्यावी. सरकार अल्पमतात असेल तर राज्यपालांनी तातडीने अधिवेशन लावलं पाहिजे. राजकीय तमाशा त्वरीत बंद व्हावा. देशात आणि जगात भाजप महाराष्ट्राची बदनामी करत आहे. आपण सत्तेसाठी जो तमाशा सुरू केला आहे, तो थांबवा अशी मोदींना विनंती आहे, असं सांगतानाच जेव्हा जेव्हा महाराष्ट्रला आव्हान दिलं गेलं तेव्हा त्यांचं पानिपत झालं, असा हल्लाबोल त्यांनी केला.