मी राजीनामा दिलाय, आता राहुल गांधींनी ठरवावं : अशोक चव्हाण

| Updated on: May 26, 2019 | 10:21 AM

मुंबई : मी राजीनामा दिला आहे, आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निर्णय घ्यावा, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावर ठेवतात, की उचलबांगडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एएनआय या वृत्तसेवा संस्थेशी बोलताना अशोक चव्हाणांनी आपण राजीनामा दिल्याचे सांगितले. अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले? […]

मी राजीनामा दिलाय, आता राहुल गांधींनी ठरवावं : अशोक चव्हाण
Follow us on

मुंबई : मी राजीनामा दिला आहे, आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निर्णय घ्यावा, असे काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यामुळे अशोक चव्हाणांना राहुल गांधी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदावर ठेवतात, की उचलबांगडी करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एएनआय या वृत्तसेवा संस्थेशी बोलताना अशोक चव्हाणांनी आपण राजीनामा दिल्याचे सांगितले.

अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?

“मी राजीनामा सुपूर्द केला आहे आणि आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ठरवावं. पक्षातील पुनर्बांधणी आणि फेरबदल करण्याबाबत राहुल गांधी यांनीच ठरवावं. आम्ही त्यांना पूर्ण अधिकार दिले आहेत. लवकरच राहुल गांधी यांच्यासोबत बैठक घेऊन चर्चा करु.” असे अशोक चव्हाण म्हणाले.

अशोक चव्हाण हे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असून, राज्यात त्यांच्याच नेतृत्त्वात लोकसभा निवडणुका पार पडल्या. महाराष्ट्रात 2014 साली दोन जागा विजयी झालेल्या काँग्रेसला यातील दोन्ही जागा राखता आल्या नाहीत. केवळ चंद्रपुरात शिवसेनेतून आलेल्या बाळू धानोरकर यांनी विजय मिळवला.

गेल्यावेळी म्हणजे 2014 साली नांदेड आणि हिंगोलीत काँग्रेसला विजय मिळाला होता. मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना स्वत:ची नांदेडची जागाही राखता आली नाही. हिंगोलीत तर राजीव सातव लढले नाहीत, मात्र सुभाष वानखेडे यांनाही हिंगोलीची जागा काँग्रेसकडे आणता आली नाही.

अशोक चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत काँग्रेसने राज्यात चांगली कामगिरी केल्याचे उदाहरण नाही. त्यात लोकसभा निवडणुकीत तर राज्यात काँग्रेसने 48 पैकी केवळ एक जागा जिंकत लाजीरवाणी कामगिरी केली. त्यामुळे पराभवाची नैतिक जबाबदारी घेत अशोक चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

आता काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर काय निर्णय घेतात आणि राज्यातील काँग्रेसची धुरा कुणाच्या खांद्यावर सोपवतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.