Aarey Agitation: काही छद्म पर्यावरणवादी, स्पॉन्सर्ड, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका, आणखी एकही झाड कापलं जाणार नाही

| Updated on: Jul 03, 2022 | 5:11 PM

Aarey Agitation: आरे संदर्भातील विरोध काही प्रमाणाज प्रांजळ आहे आणि काहीप्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. पर्यावरणवाद्यांचा सन्मान आहे. त्यांचं म्हणणं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे.

Aarey Agitation: काही छद्म पर्यावरणवादी, स्पॉन्सर्ड, देवेंद्र फडणवीसांची सडकून टीका, आणखी एकही झाड कापलं जाणार नाही
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई: आरेत मेट्रोची कारशेड तयार करण्यात येणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी जाहीर केलं होतं. त्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी विरोध केला होता. माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे (amit thackeray) यांनीही आरेतील मेट्रो कारशेडला विरोध केला होता. मात्र, देवेंद्र फडणवीस आपल्या निर्णयावर ठाम आहे. काही छद्म आणि स्पॉन्सर्ड पर्यावरणवादी आरेतील कारशेडला विरोध करत आहेत. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि हरीत लवादात हरल्यानंतर आता काही पर्यावरणवादी विरोध करत आहेत. अशा विरोधाला काही अर्थ नाही, असं सांगतानाच चांगल्या पर्यावरणवाद्यांशी आम्ही चर्चा करू. त्यांची समजूत काढू, असं फडवणवीस यांनी सांगितलं. आरेतील झाडे कापलेली आहेत. त्यामुळे तिथे नव्याने झाडे कापायची नाहीयेत. मात्र, काही लोकांना याची माहिती नसल्यानेच ते विरोध करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. आरे संदर्भातील विरोध काही प्रमाणाज प्रांजळ आहे आणि काहीप्रमाणात स्पॉन्सर्ड आहे. पर्यावरणवाद्यांचा सन्मान आहे. त्यांचं म्हणणं मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. हरित लवादाने कारशेड करण्यास परवानगी दिली आहे. सर्वोच्च न्यायालायनेही परवानगी दिली आहे. तो प्रकल्प सुरू झालेला आहे. 25 टक्के काम पूर्ण झाले आहेत. झाडे कापलेले आहेत. आता झाडे कापण्याची गरज नाही. त्या ठिकाणी काम सुरू केलं तर पुढच्या एक वर्षात काम पूर्ण होईल आणि मेट्रो सुरू होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तर मेट्रो सुरू होण्यास चार वर्ष लागणार

झाडं कापली आहेत. नव्याने झाडं कापली जाणार नाहीत. तरीही विरोध आहे. काहींचं आंदोलन छद्म पर्यावरणवादी बनून होत आहे. आम्ही पर्यावरणवाद्यांशी चर्चा करू. मेट्रो मुंबईचा अधिकार आहे. मेट्रो नसल्याने मुंबई प्रदूषणामुळे रोज होरपळत आहे. हे पाप आम्ही चालू देणार नाही. कारशेड कांजूरमार्गला नेली तर चार वर्ष लागतील. 10 ते 15 हजार कोटी खर्च होईल. नाकापेक्षा मोती जड होईल. या प्रकरणात कोर्टात केसही आहे. आम्ही पर्यावरण पूरक निर्णय घेणार आहोत. आरेचं आंदोलन करणाऱ्या काही लोकांना वस्तुस्थिती माहीत नाही. असे पर्यावरणवादी आणि छद्म पर्यावरणवादी मिळून हे आंदोलन करत आहेत. चांगल्या पर्यावरणवाद्यांना आम्ही सांगणार आहोत. त्यांना समजावणार आहोत. हे लोक उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि हरीत लावादात हरले आहेत. त्यानंतरही आंदोलन करत आहेत, असं ते म्हणाले.

अमरावती प्रकरणी मास्टरमाइंड अटकेत

अमरावतीची घटना गंभीर आहे. निष्ठूरपणे मारलं आहे. ही क्रुरता आहे. याप्रकरणी आरोपीला पकडलं आहे. मास्टरमाइंडलाही पकडलं आहे. एनआयएही चौकशी करत आहे. बाहेरचं काही कनेक्शन पाहिलं जात आहे. देशात तणाव निर्माण करण्याचा परदेशी शक्तींचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. त्याचीही चौकशी केली जाणार आहे. आधी दरोडा दाखवला. त्याचीही चौकशी होत आहे. उदयपूरच्या घटनेनंतर हे प्रकरण घडलं. तरीही त्याची चौकशी सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

निर्णय सरसकट रद्द करणार नाही

मागच्या सरकारचे कोणतेही निर्णय सरसकट बदलणार नाही. ज्यात चुका आहेत, ज्या निर्णयात भ्रष्टाचाराचा वास येत आहे आणि जे निर्णय चांगल्या हेतूने घेतले नाहीत, ते रद्द करू. अभ्यास करूनच निर्णय रद्द करू, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विश्वास ठराव जिंकू

राहुल नार्वेकर यांच्या रुपाने विधीज्ञ असणारा युवा तरुण अध्यक्ष महाराष्ट्राला मिळाला आहे. 164 सदस्यांनी आम्हाला मतदान केलं. आम्ही विश्वास ठराव जिंकू याचा विश्वास आहे. आमच्या युतीकडे पूर्ण बहुमत आहे. उद्या विश्वास प्रस्ताव ठेवणार आहोत आणि शिंदेच्या नेतृत्वातील आमचं सरकार विश्वास बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.