Jayant Patil : एकनाथ शिंदेंना भाजपाने मुख्यमंत्रीपदाची संधी का दिली?, जयंत पाटलांनी सांगितले कारण

| Updated on: Jul 01, 2022 | 2:03 PM

सत्ता मिळवण्यासाठी ज्या मार्गाचा वापर करण्यात आला, त्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला होता. हा रोष शांत करण्यासाठी भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

Jayant Patil : एकनाथ शिंदेंना भाजपाने मुख्यमंत्रीपदाची संधी का दिली?, जयंत पाटलांनी सांगितले कारण
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच मुख्यमंत्री होणार असा अंदाज सर्व स्तरामधून व्यक्त करण्यात येत होता. मात्र अचानक बंडखोर गटाचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री करून भाजपाने विरोधीपक्षासह स्वपक्षातील नेत्यांना अनपेक्षित असा धक्का दिला. भाजपाच्या या बदललेल्या भूमिकेवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रावादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील यावर भाष्य केले आहे. भाजपाच्या या निर्णयामध्ये मला तरी कुठले धक्कातंत्र दिसले नाही. मात्र सत्ता मिळवण्यासाठी ज्या पद्धतीने प्रयत्न करण्यात आले, त्यामुळे राज्यातील जनतेमध्ये एक रोष निर्माण झाला होता. या रोषाला शांत करण्यासाठीच भाजपाने असा निर्णय घेतला असावा असे वाटते असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

‘भाजपात आदेशाचे पालन करावेच लागते’

पुढे बोलताना जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. मात्र त्यांना वरून सूचना आली. भाजपामध्ये वरून आलेल्या आदेशाचे पालन करावेच लागते. देवेंद्र फडणवीस यांना देखील आपणच मुख्यमंत्री होणार असे वाटत असावे. मात्र वरिष्ठांच्या आदेशापुढे त्यांचा नाईलाज झाला. त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. याचे दुःख त्यांनाही झाले असेलच असंही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

‘शिवसैनिक कायम उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ‘

या सर्व घाडमोडी घडून गेल्यानंतर आज उद्धव ठाकरे हे शिवसेना भवनमध्ये दाखल झाले आहेत. यावर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना प्रमुख म्हणून ते पुन्हा एकदा जिद्दीने कामाला लागले आहेत. जे आमदार नाहीत मात्र शिवसैनिक आहेत ते कायमच उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे आहेत. आमदारांना कुठेही जाऊद्या पण शिवसैनिक शिवसेना सोडणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली. त्यांच्या शपथ विधीनंतर आता विरोधी पक्षनेता कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत पाटील यांना विचारले असता विरोधी पक्षनेत्याबाबतचा निर्णय शरद पवार हे घेतील असे त्यांनी सांगितले.