Maharashtra politics : आज राज ठाकरे शिवसेनेत असायला हवे होते; …तर हे बंड झालेच नसते, वाचा काय वाटतं शिवसैनिकांना?

| Updated on: Jun 24, 2022 | 12:23 PM

आज शिवसेनेसमोर मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आमदार आणि मंत्र्यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेत फुट पडली आहे. अशाप्रसंगी राज ठाकरे हे शिवसेनेत असायला हवे होते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

Maharashtra politics : आज राज ठाकरे शिवसेनेत असायला हवे होते; ...तर हे बंड झालेच नसते, वाचा काय वाटतं शिवसैनिकांना?
उद्धव ठाकरे, राज ठाकरे
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : शिवसेनेसमोर (Shiv Sena) आज मोठा पेचप्रसंग निर्माण झाला आहे. शिवसेनेमधील विश्वासू नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यानंतर पक्षात ज्यांचे स्थान होते, त्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षातून बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतून जवळपास सर्वच आमदारांचा पाठिंबा मिळाला आहे. शिवसेनेकडे आता अवघे दहा ते बारा आमदार राहिले असल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेना या पक्षाचा उदयच हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर झाला होता. याच मुद्द्यावर पक्षाला प्रचंड जनाधार लाभला. पक्षाने राज्यातील सत्ता काबीज करण्यापर्यंत मजल मारली. मात्र याच मुद्द्यावरून आता पक्षात फूट पडली आहे. एकनाथ शिंदे हे आता पक्षावर दावा सांगत आहेत. आमदारांनी साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे हातबल झाले आहेत. शेवटचा उपाय म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भावनिक कार्डचा देखील वापर केला. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे भावनिक आवाहान केले. मात्र त्याचा देखील काही उपयोग झाला नाही.

आमदारांच्या रोषाचा विस्फोट?

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना आमदारांचा मिळणारा पाठिंबा वाढतच आहे. आपल्याला शिवसेनेच्या 55 पैकी 50 आमदारांनी पाठिंबा दिल्याचा दावा शिंदेंनी केला आहे. त्यामुळे शिवसेना हातबल झाली असून, आता तडजोडीची भाषा सुरू झाली आहे. जर बंडखोर आमदार हे पुन्हा शिवसेनेमध्ये येणार असतील तर शिवसेना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यास तयार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. मात्र भाजपासोबत युती या एकाच मुद्द्यावर बंडखोर आमदार आडून बसले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार आणि शिवसेना अडचणीत सापडली आहे. शिवसेना आणि भाजपाला 2019 च्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र शिवसेनेने भाजपासोबत न जाता काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी करून, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र या सरकारबाबत पूर्वीपासूनच शिवसेनेच्या आमदारांमध्ये रोष होता. त्या रोषाचा आज विस्फोट झाल्याचे पहायला मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे शिवसेनेत असते तर?

या सर्व परिस्थितीमध्ये आज राज ठाकरे हे जर शिवसेनेमध्ये असते तर परिस्थिती हाताबाहेर गेलीच नसती, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. अनेक शिवसैनिक तसेच ठाकरे कुंटुंबाचे जे निकटवर्तीय आहेत, त्यांच्यामध्ये देखील हीच चर्चा आहे. आज राज ठाकरे हे शिवसेनेमध्ये असते तर ते आपला भाऊ उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी उभे राहिले असते. शिवसेनेमधील हे बंड त्यांनी मोडून काढले असते, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याबाबत बोलताना राजकीय विश्लेषक अमिताभ तिवारी यांनी म्हटले आहे की, बाळासाहेबांनी पक्षाची सुत्रे ही उद्धव ठाकरे यांच्या हाती सोपावली. मात्र तेव्हा देखील राज ठाकरे हेच प्रमुख असावेत अशी पक्षातील अनेकांची इच्छा होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेनेतून बाहेर पडत मनसेची स्थापना केली. राज ठाकरे यांना आजही प्रचंड जनाधार आहे. जर राज हे शिवसेनेत असते, तर त्यांनी उद्धव यांना या पेचप्रसंगातून बाहेर काढले असते.