महाराष्ट्र आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल : संजय राऊत

| Updated on: Jun 12, 2019 | 6:23 PM

महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून तरुण, तजेलदार चेहऱ्याची गरज आहे. जो तरुण महाराष्ट्राला, तरुणांना दिशा देऊ शकतो... महाराष्ट्रतील लोकही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

महाराष्ट्र आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारेल : संजय राऊत
Follow us on

मुंबई : युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या निवडणूक लढण्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक वक्तव्य केलंय. आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढवावी हा महाराष्ट्राच्या आणि शिवसेनेच्या इतिहासातला महत्वाचा निर्णय आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याबाबत निर्णय घेतील. पण मला तुम्ही वैयक्तिक मत विचाराल, तर महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून तरुण, तजेलदार चेहऱ्याची गरज आहे. जो तरुण महाराष्ट्राला, तरुणांना दिशा देऊ शकतो… महाराष्ट्रतील लोकही आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारतील, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला एकच मंत्रिपद मिळणार असल्याचं वृत्त आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळ विस्तार वगैरे या गोष्टी त्या त्या ठरलेल्या मुहूर्तानुसार होतील आणि पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे ठरवतील मंत्री कुणाला करायचं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

“युतीत सगळं काही आलबेल”

शिवसेना-भाजप यांच्या युतीत विधानसभेच्या जागा वाटपावरुन धुसफूस सुरु असल्याचं बोललं जातंय. पण युतीत अपेक्षेपेक्षा जास्त आलबेल आहे, त्यामुळे युतीला चरोटाही जाणार नाही, असं संजय राऊत यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्या बैठकीत जो फॉर्म्युला ठरला, त्या अलीकडे-पलीकडे काहीही होणार नाही, असंही ते म्हणाले.

दरम्यान, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता. यावर संजय राऊत म्हणाले, “चंद्रकात पाटील हे ज्येष्ठ मंत्री आहेत, आमचे मित्र आहेत, पण ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत का? अमित शाहांच्या जागी त्यांची नेमणूक झाल्याचं मी तरी कुठे वाचले नाही. किंवा आम्हाला कळवलेले नाही. अमित शाह-उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत जे ठरले ती काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. मुख्यमंत्री सर्वांसमक्ष बोलले पॉवर शेअरिंग फिफ्टी-फिफ्टी या वाक्याचा अर्थ समजून घ्या, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.