‘दोन वर्षात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेला, अर्ध मंत्रिमंडळ डागाळलेलं’, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात

| Updated on: Nov 28, 2021 | 4:38 PM

राज्यात 5 वर्षे देवेंद्र फडणविसांचा (Devendra Fadnavis) विकासाचा कार्यकाळ आपण पाहिला. भ्रष्टाचाराचा एकही डाग त्या सरकारनं लावून घेतला नाही. आता 2 वर्षात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेलाय. यांच्या अर्ध्या मंत्रिमंडळावर डाग आहेत', अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

दोन वर्षात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेला, अर्ध मंत्रिमंडळ डागाळलेलं, प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारवर घणाघात
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
Follow us on

नाशिक : राज्यातील महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार टीका-टिप्पणी पाहायला मिळत आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. राज्यात 5 वर्षे देवेंद्र फडणविसांचा (Devendra Fadnavis) विकासाचा कार्यकाळ आपण पाहिला. भ्रष्टाचाराचा एकही डाग त्या सरकारनं लावून घेतला नाही. आता 2 वर्षात महाराष्ट्र 20 वर्षे मागे गेलाय. यांच्या अर्ध्या मंत्रिमंडळावर डाग आहेत’, अशी घणाघाती टीका दरेकर यांनी केलीय. ते आज नाशिकमध्ये बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सकाळी म्हणाले जनतेनं आम्हाला आपलं मानलं. पण सरकारनं जनतेला आपलं मानलं नाही. 2 वर्षात राज्यात सरकार नावाची चीज अस्तित्वात नाही. यातून मार्ग काढू शकतं ते आमचं सरकार. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निश्चितपणे सरकार येणार. कधी येणार तेही आम्ही सांगणार. थोडं गनिमी काव्यानं वागणार, असा सूचक इशारा दरेकर यांनी दिलाय. तसंच चंद्रकांत पाटलांवर केंद्रीय नेतृत्व नाराज नाही. ही चर्चा तुमच्याकडूनच ऐकतोय. कोणत्याची प्रकारे नाराजीची चर्चा नाही. जितेंद्र आव्हाड हे वादग्रस्त विधान करुन वातावरण खराब करत आहेत. ते आता मंत्री आहेत. त्यांनी जबाबदारीनं वागावं, असा सल्लाही दरेकर यांनी आव्हाडांना दिलाय.

‘कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला’

ठाकरे सरकारच्या दोन वर्षाच्या काळात चालू प्रकल्प ठप्प झाले. गुन्हेगारीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर आला. ही महाविकास आघाडीची उपलब्धी आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. नाशिक ही गुन्हेगारी नगरी होते काय अशी भीती वाटत आहे. भाजपच्या मंडल अध्यक्षाची खुलेआम हत्या होते. राजकीय आशीर्वादानेच हत्या करण्यात आलीय. युनियनच्या वर्चस्वावरुन वाद झाल्याचं स्पष्ट आहे. आरोपी विनोद बर्वे याने लावलेल्या युनियनच्या बॅनरवर छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांचे फोटो आहे. काही दिवसांपूर्वी आरोपी विनोद बर्वेने राष्ट्रवादीत प्रवेश केला. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याची टीका दरेकर यांनी केली आहे.

दरेकरांचा भुजबळांवर हल्लाबोल

दरेकर यांनी मंत्री भुजबळांवरही गंभीर आरोप केलाय. भुजबळ विनोद बर्वेंना चांगली जबाबदार देणार म्हणाले होते. हीच जबाबदारी देणार होते का? भुजबळ पालकमंत्री झाल्यावर शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. या प्रकरणात मोक्का, फाशी अशी शिक्षा अपेक्षित आहे. आरोपी बाहेर आला तर कायद्यावर विश्वास राहणार नाही, असं दरेकर म्हणाले. तसंच अमोल ईघे यांच्या हत्येची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी. विधानसभेतही हा मुद्दा आम्ही उपस्थित करणार. या प्रकरणात तथ्य असेल तर पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही दरेकर यांनी केलीय.

शेतकरी प्रश्नावरहीन ठाकरे सरकारवर हल्लाबोल

शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण केली का? दिलेल्या सर्व वचनांचा भंग केला गेला. सवलत तर दूरच, असणारी वीज कापण्याचं काम आपण केलं, अशी टीकाही दरेकरांनी केलीय. संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. अनिल परब यांची चौकशी सुरु आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या नातेवाईकांची आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे विकास कामांकडे लक्ष नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. त्रिपुरातील कथित घटनेचे पडसाद मालेगाव, नांदेड, अमरावतीत उमटले. शांततेत काढलेल्या मोर्चावर कारवाई करण्यात आली. तर दुसऱ्या बाजूला पुरोगामीत्वाचे ढोल बडवायचे, अशी टीकाही दरेकर यांनी केलीय.

इतर बातम्या :

‘आम्ही पंतप्रधानांना वाकवलं, तु्म्हाला वाकवण्यासाठी किती वेळ लागणार’ एसटी संपावरुन आडम मास्तरांचा परबांना इशारा

‘आमच्या कामावर अमित शाह समाधानी’, चंद्रकांत पाटलांकडून संघटनात्मक बदलांच्या चर्चेला पूर्णविराम