महाराष्ट्रातील सर्वात रोमहर्षक लढत, तीन घराणे, तीन तरुण आणि एक जागा!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:12 PM

अहमदनगर : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. काही मोजके मतदारसंघ वगळता सर्व पक्षांनी बहुतांश मतदारसंघांमध्ये आपापले उमेदवारही घोषित केले आहेत. उमेदवारी, उमेदवार बदलणं, नाराजीनामे, बंडखोरी वगैरे सुरु झालं असताना, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष मात्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. विखे पाटील, जगताप आणि गांधी अशी अहमदनगर जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या घराण्यामधील ही लढत […]

महाराष्ट्रातील सर्वात रोमहर्षक लढत, तीन घराणे, तीन तरुण आणि एक जागा!
Follow us on

अहमदनगर : लोकसभेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. काही मोजके मतदारसंघ वगळता सर्व पक्षांनी बहुतांश मतदारसंघांमध्ये आपापले उमेदवारही घोषित केले आहेत. उमेदवारी, उमेदवार बदलणं, नाराजीनामे, बंडखोरी वगैरे सुरु झालं असताना, अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष मात्र नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाकडे लागलं आहे. विखे पाटील, जगताप आणि गांधी अशी अहमदनगर जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या घराण्यामधील ही लढत मानली जात असून, महाराष्ट्रातील सर्वात रोमहर्षक सामना नगरमध्ये रंगणार असल्याचे उमेदवारांवरुन स्पष्ट झाले आहे.

रोमहर्षक लढत का…?

नगर दक्षिणची जागा सध्या भाजपकडे आहे. दिलीप गांधी हे इथून भाजपचे विद्यमान खासदार आहेत. मात्र, त्यांना भाजपकडून डावलण्यात आलं आणि नुकतेच भाजपवासी झालेल्या सुजय विखे पाटील यांना भाजपने तिकीट दिलं. आता भाजपने ‘आयाराम’ सुजय विखेंना तिकीट दिल्याने नाराज झालेल्या दिलीप गांधींनी मुलाच्या खांद्यावर बंदुक ठेवली आहे. मुलगा सुवेंद्र गांधी हे सुजय विखेंना अपक्ष लढून भिडणार आहेत. इथवरच नगर दक्षिण मर्यादित नाही. तर आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने नगरमधील आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देऊन, सुजय विखेंच्या आव्हानांमध्ये शंभरपटीने वाढ केली आहे. त्यामुळे सुजय विखे विरुद्ध संग्राम जगताप विरुद्ध सुवेंद्र गांधी अशी तिहेरी लढत रंगणार असून, तीन घरण्यांची प्रतिष्ठाही पणाला लागली आहे.

सुजय विखेंचा भाजपप्रवेश आणि पडसाद

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि नगर दक्षिणची समीकरणंच बदलली. भाजपने ऐन निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षनेत्याच्या घरातच खिंडार पाडली. खूप दिवस काँग्रेसकडून तिकीटाची अपेक्षा बाळगून असलेल्या सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी काही नगर दक्षिणची जागा सोडायला तयार झाली नाही. पर्यायाने सुजय विखेंनी ‘हात’ सोडून ‘कमळ’ हाती घेतला. प्रवेशाच्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुजय विखेंना तिकीट मिळणार असल्याची घोषणा केली आणि त्याचे वेगवेगळ्या घटकांवर पडसाद उमटले.

सर्वप्रथम काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी राधाकृष्ण विखे पाटलांबद्दल नाराजी व्यक्त झाली. कारण मुलाला थांबवण्यात त्यांना अपयश आले आणि सत्ताधारी भाजपने थेट विरोधी पक्षनेत्यालाच शह दिला. दुसरीकडे, सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे भाजपचे नगरमधील विद्यमान खासदार दिलीप गांधी हेही नाराज झाले. कारण त्यांचं तिकीट पर्यायाने कापलं गेलं.

ज्या नगर दक्षिणच्या जागेचा हट्ट राष्ट्रवादीने धरला आणि त्यामुळे सुजय विखेंना भाजपमध्ये जावं लागलं, त्या जागेवरुन राष्ट्रवादीने तोडीस तोड उमेदवार शोधला. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना तिकीट देऊन राष्ट्रवादीने सुजय विखेंसमोर मोठं आव्हान निर्माण केलं. तर दुसरीकडे, भाजप खासदार दिलीप गांधींचा मुलगा सुवेंद्र गांधी यांनी सुजय विखेंवर अप्रत्यक्ष टीका करत, अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली. एकट्या सुजय विखेंच्या भाजप प्रवेशामुळे नगर दक्षिणमध्ये अनेक राजकीय पडसाद उमटलेले दिसले.

सुजय विखे पाटील यांची ताकद काय?

सुजय हे ‘विखे पाटील’ घराण्यातील आहेत. माजी केंद्रीय मंत्री सहकारमहर्षी दिवंगत बाळासाहेब विखे पाटील यांचे सुजय हे नातू आहेत, तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते सुपुत्र आहेत. विखे पाटील कुटुंबाचं नगर दक्षिणमध्ये दांडगा जनसंपर्क आहेच, सोबत विविध कारखाने, संस्था, संघटना, समाजसेवी संस्था इत्यादींमुळे संघटन शक्तीही मजबूत आहे. या सर्व गोष्टीचा फायदा सुजय विखे पाटील याना होऊ शकतो.

संग्राम जगताप भारी पडणार?

नगरमधील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार अरुणकाका जगताप यांचे सुपुत्र म्हणून संग्राम जगताप यांची ओळख आहेच, सोबत संग्राम जगताप हेही आमदार आहेत. शिवाय, नगरमधील डॅशिंग युवा नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत. नगरमधील तरुणवर्गात त्यांची क्रेझ आहे. शिवाय, राजकीय संबंध, राजकारणातली नातीगोती संग्राम यांच्या मदतीला धावू शकतात. संग्राम जगताप यांचे सासरे म्हणजे आमदार शिवाजीराव कर्डिले हे भाजपचे नगरमधील मोठे नेते आहेत.

सुवेंद्र गांधी हे सुजय विखेंची मतं फोडणार?

सुवेंद्र गांधी हे भाजपचे नगर दक्षिणचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचे सुपुत्र आहेत. दिलीप गांधी यांचे सुपुत्र या पलिकडे त्यांचे फारसे काम नाही. नगरसेवकपदाची निवडणूकही सुवेंद्र गांधी पराभूत झाले होते. मात्र, दिलीप गांधी यांचा त्यांना पाठीशी असल्याने भाजपच्या मतांवर मोठा परिणाम होई शकतो. सुवेंद्र गांधी अपक्ष लढणार असल्याने, त्याचा थेट फटका सुजय विखे पाटील यांना बसेल, हे निश्चित मानले जात आहे. याचा फायदा थेट संग्राम जगताप यांना होईल.

बाळासाहेब थोरात गटाचा सुजय विखेंना फटका बसणार?

नगरमध्ये काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. एक विखे पाटील गट आणि दुसरा थोरात गट. सुजय विखेंनी भाजपप्रवेश केल्यानंतर बाळासाहेब थोरात म्हणाले होते, “विखे पाटील कुटुंबाला काँग्रेसने हवं ते दिलं, त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटलांनी मुलाला थांबवायला हवं होतं.” त्यानंतर विखे पाटलांनीही बाळासाहेब थोरातांवर पलटवार केला. थोरात विरुद्ध विखे पाटील हा वाद नगरमध्ये जुना आहे. त्यामुळे सुजय विखेंच्या पराभवासाठी थोरात गट जोमाने कामाला लागेल, हे निश्चित.

‘नगर दक्षिण’ कोण जिंकणार?

सुजय विखेंनी भाजपप्रवेश करुन, हवा निर्माण केली असली, तरी राष्ट्रवादीने संग्राम जगताप यांना उमेदवारी देऊन त्यांची हवा काढली. शिवाय, दुसरीकडे सुवेंद्र गांधी यांनीही अपक्ष लढणार असल्याचे जाहीर केल्याने, सुजय विखेंच्या विजयाची हवा आणखी कमी झाली. त्यामुळे सुजय विखेंसमोर संग्राम जगताप यांच्यासारखं तगडं आव्हान आणि सुवेंद्र गांधी यांचं बंड असे दुहेरी आव्हान असेल.

महाराष्ट्रातील सर्वात रोमहर्षक लढत म्हणून नगर दक्षिणकडे पाहिले जात आहे. नगर दक्षिणमध्ये तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 23 एप्रिलला मतदान होणार असून, 23 मे रोजी निकाल लागेल आणि ‘नगर दक्षिण’चा सुभेदार कोण, हे स्पष्ट होईल.