कुविख्यात गुंड मुन्ना यादव, हैदर आजमशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा फडणवीसांना सवाल

| Updated on: Nov 10, 2021 | 11:05 AM

नागपूरचा कुविख्यात गुंड मुन्ना यादव व बांग्लादेशी नागरिकांना साथ देणार हैदर आजम यांच्याशी फडणवीसांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

कुविख्यात गुंड मुन्ना यादव, हैदर आजमशी तुमचा संबंध काय?; नवाब मलिकांचा फडणवीसांना सवाल
नवाब मलिक
Follow us on

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते, मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. एनसीबीच्या खंडणीप्रकरणावरून फडणवीस लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत असल्याचे मलीक यांनी म्हटले आहे. तसेच नागपूरचा कुविख्यात गुंड मुन्ना यादव व बांग्लादेशी नागरिकांना साथ देणार हैदर आजम यांच्याशी फडणवीसांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. ते मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

काय म्हणाले मलिक? 

सध्या आर्यन खान प्रकरणात एनसीबीची चौकशी सुरू आहे. या प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी देवेंद्र फडणवीस उटसूट आरोप करत आहेत. माझे नाही तर त्यांचेच अंडरवर्ल्ड कनेक्शन असल्याचे दिसून येते. फडणवीस मुख्यमंत्री असताना नागपूरचा कुविख्यात गुंड मुन्ना यादवला कन्स्ट्रक्शन वर्क्स बोर्डाचा सदस्य बनवण्यात आले. त्याच्यावर अनेक गंभीर प्रकरणात गुन्हे दाखल आहेत. तो भाजपमध्ये येऊन पवित्र झाला का? असा सवाल मलिकांनी उपस्थित केला आहे. हैदर आजम या बांग्लादेशी घुसखोरांना साथ देणाऱ्या व्यक्तीसोबत देखील फडणवीस यांचे संबंध आहेत. बांग्लादेशी घुसखोर प्रकरणात त्याची मालाड पोलिसांकडून चौकशी सुरू होती. हैदर आजमची पत्नी सुद्धा बांग्लादेशी आहे. मात्र हे प्रकरण तेव्हा फडणवीसांकडून दाबण्यात आल्याचा गौप्यस्फोट मलिकांनी केला आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्या इशाऱ्यावर बिल्डर लॉबीकडून वसूली सुरू होती असेही मलिक यावेळी म्हणाले आहेत.

नोटबंदीवरून निशाणा 

8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली. तेव्हा मोदी म्हणाले होते की हे  सरकारचे एक ऐतिहासिक पाऊल आहे. या निर्णयामुळे गुन्हेगारीला आळा बसेल, दहशतवाद समाप्त होईल तसेच काळा पैसा बाहेर येईल. मात्र यातील एकही साध्य झाले नाही. नोटबंदी केल्यानंतर संपूर्ण देशात दोन हजार आणि पाचशेच्या बनावट नोटा पकडल्या गेल्या. तामिळनाडू आणि पंजाबमध्ये आरोपींवर कारवाई झाली, मात्र महाराष्ट्रात एकही बनावट नोट पकडण्यात आली नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता, असा आरोप त्यांनी केला आहे.

काय म्हणाले होते फडणवीस?

दरम्यान त्यापूर्वी मंगळवारी फडणवीस यांनी देखील एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये फडणवीसांनी मलिकांवर गंभीर आरोप केले होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डशी कनेक्शन असून, त्यांनी बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या आरोपींकडून कोट्यावधीची जमीन अवघ्या 20 लाखांमध्ये घेतल्याचा आरोप फडणवीस यांनी केला होता. आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत मलिक यांनी आपल्यावरील आरोपांना प्रत्त्युत्तर दिले आहे.

संबंधित बातम्या 

मोदींनी नोटाबंदी केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात बनावट नोटांचे रॅकेट चालवले जायचे: नवाब मलिक

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक जाहीर, कुणाला संधी मिळणार?