“कदाचित मंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल”

| Updated on: Sep 17, 2021 | 1:57 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.

कदाचित मंत्री रावसाहेब दानवे यांना शिवसेनेत यायचं असेल
RAOSAHEB DANVE
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या औरंगाबादमधील (Aurangabad) भाषणाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्याकडे पाहून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना भावी सहकारी म्हटलं. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी रावसाहेब दानवे यांनाच टोमणा लगावला. रावसाहेब दानवे यांनाच शिवसेनेत यायचं असेल तर? असं म्हणत भुजबळांनी टोला लगावला. मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

छगन भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट आहे.राजकारणात विरोधी पक्ष आपले दुश्मन नसतात. वैचारिक मतभेद असू शकतात पण दुश्मन नाही. कदाचित दानवे शिवसेनेत येणार असतील तर”

भाजपकडून शिवसेनेची अवहेलना

काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मुख्यमंत्र्यांना त्रास होतोय या देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याशी मी सहमत होऊ शकत नाही. कारण काँग्रेस, राष्ट्रवादीचा काहीही त्रास मुख्यमंत्र्यांना नाही. उलट मागील 5 वर्ष भाजपाने शिवसेनेला कशी वागणूक दिली सगळ्यांना माहित आहे. केंद्र सरकारमध्ये शिवसेनेला दिलेले मंत्रीपद आणि केलेली अवहेलनाही पाहिली, असं छगन भुजबळ म्हणाले.

सरकारमध्ये असून दिलेली वागणूक याचा लेखा जोखा मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे मला असं काही वाटत नाही. महाविकास आघाडीला धोका नाही, महाविकास आघाडीपासून इतरांना धोका असू शकेल, असा टोलाही छगन भुजबळ यांनी लगावला.

म्हणून अध्यादेश

ज्या पोटनिवडणुका आहेत त्या आणि ज्या मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी पंचवार्षिक निवडणुका आहेत, तिथलं ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आपण अध्यादेशाचा मार्ग स्वीकारला आहे. तामिळनाडू आणि इतर राज्यांनीही हा मार्ग अवलंबला आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

राज्यपालांनी अध्यादेशावर तातडीने स्वाक्षरी करावी

आमची राज्यपालांना विनंती आहे लवकर अध्यादेशावर स्वाक्षरी करावी. ओबीसींच्या भल्यासाठी ते निर्णय घेतील अशी खात्री आहे. निवडणूक आयोग महाराष्ट्रात तरी स्वतंत्रपणे काम करतोय. मी आताच मुख्यमंत्र्यांशी बोललो. परवा मंत्रिमंडळाने अध्यादेश मंजूर केला. त्याचे प्रारुप तयार होतंय. हा अध्यादेश आज राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी पाठवला जाईल. राज्यपालांची स्वाक्षरी झाली की हा अध्यादेश निवडणूक आयोगाकडे पाठवला जाईल, असं छगन भुजबळ म्हणाले.

सोनू सूदने एवढं चांगलं काम केल्यावर त्याने भाजपचा प्रचार केला नाही. त्याने दुसऱ्या पक्षाचा प्रचार केला. त्यामुळे आता ते (भाजप) आपलं काम करत आहेत. सोनू सूदने भाजपचं ब्रॅडिंग केलं असतं तर त्याला त्रास झाला नसता, असा हल्लाबोलही भुजबळांनी केला.

संबंधित बातम्या  

उद्धवजींना ‘रिअलाईज’ झाल्यामुळेच आम्हाला भावी सहकारी म्हणाले असावेत : देवेंद्र फडणवीस

आमचे भावी सहकारी ते रेल्वे रुळ सोडून आमच्या स्टेशनवर येऊ शकता, उद्धव ठाकरेंची भाजपला पहिल्यांदाच खुली ऑफर!

काल चंद्रकांत पाटील म्हणाले, माजी मंत्री म्हणू नका, दोन तीन दिवसात बघा, आज मुख्यमंत्री म्हणाले, भावी सहकारी!