मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने; कांजूरमार्गची जागा आमची, केंद्राचा दावा

| Updated on: Nov 03, 2020 | 10:41 AM

केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी याबाबत नमूद केलं आहे. (Metro Carshed shifted to kanjurmarg Central Government letter to state government) 

मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने; कांजूरमार्गची जागा आमची, केंद्राचा दावा
Follow us on

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नुकतंच केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी याबाबत नमूद केलं आहे. (Metro Carshed shifted to kanjurmarg Central Government letter to state government)

“कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही,” असे केंद्राने या पत्रात नमूद केले आहे.

“यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा,” असेही केंद्राने या पत्रात लिहिलं आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या या पत्रानंतर आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. तसेच केंद्राच्या या पत्रानंतर राज्य सरकार यावर काय उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरे कारशेड कांजूरमार्गला, मुख्यमंत्र्यांचा निर्णय

गेल्या 11 ऑक्टोबरला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रो प्रकल्पाची आरे परिसरातील कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला. कांजूर येथील कारशेडसाठी मेट्रोला राज्य सरकारकडून मोफत जमीन दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच आरेतील कारशेडसाठी आतापर्यंत खर्च झालेला पैसा फुकट जाऊ देणार नाही. आरेत मेट्रोच्या कारशेडसाठी उभारण्यात आलेली इमारत अन्य कामांसाठी वापरली जाईल. तसेच या भागात उभारण्यात आलेले बोगदे आणि ट्रॅक मेट्रोच्या उर्वरित मार्गाशी जोडले जातील, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले होते.

आरे आंदोलनावेळी पर्यावरणवाद्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जाहीर केले होते.(Metro Carshed shifted to kanjurmarg Central Government letter to state government)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी: मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा

आरे कारशेड प्रकरण भोवलं, अश्विनी भिडेंची मेट्रो 3 प्रकल्पावरुन उचलबांगडी