Aurangabad | शरद पवारांचं झूठ बोले कौआ काटे? औरंगाबाद नामांतरावरून खा. इम्तियाज जलील यांची पोस्ट काय?

| Updated on: Jul 12, 2022 | 1:35 PM

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकांना उल्लू बनवत आहेत. या लोकांचे कपडे काढले तर आतून RSS चे लोक सापडतील, अशी जहरी टीका खा. इम्तियाज जलील यांनी केली आहे.

Aurangabad | शरद पवारांचं झूठ बोले कौआ काटे? औरंगाबाद नामांतरावरून खा. इम्तियाज जलील यांची पोस्ट काय?
Follow us on

औरंगाबादः औरंगाबाद शहराचं संभाजीनगर असं नामांतर करण्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) खोटं बोलत असल्याचा आरोप एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केला आहे. मविआ सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संभाजीनगरचा निर्णय कसा घेतला, यावरून खा. जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवरच थेट टीका केली आहे. तर शरद पवार यांच्या परस्पर दोन भिन्न प्रतिक्रियांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी हा निर्णय काँग्रेस-राष्ट्रवादी तसेच शिवसेनेनं एकमताने घेतल्याचं म्हटलं. तर काल औरंगाबाद येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी संभाजीनगरचा अंतिम निर्णय घेताना आमच्याशी संवाद साधण्यात आला नाही, अशी प्रतिक्रिया दिली. खा. जलील यांनी शरद पवारांचे हे दोन्ही व्हिडिओ आज सोशल मीडियावर पोस्ट केले असून त्यावर शरद पवार यांना झूठ बोले कौआ काटे.. असं म्हटलं आहे.

पहिल्या व्हिडिओत काय?

खा. जलील यांनी पोस्ट केलेल्या दोन दिवसांपूर्वीच्या व्हिडिओत शरद पवार म्हणालेत, मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी प्रस्ताव मांडला होता तेव्हा काहींचे मत भिन्न होती. पण त्यावेळेला राज्य एका संकटातून जात होतं. त्यामुळे मविआमध्ये अंतर्गत मतभेद आहेत, असं चित्र बाहेर दिसू नये, सामंजस्यानं निर्णय घ्यावा, अशी चर्चा मंत्र्यांमध्ये झाली आणि हा निर्णय एकमताने घेण्यात आला…’

दुसऱ्या व्हिडिओत काय?

शऱद पवार हे औरंगाबाद दौऱ्यावर नुकतेच येऊन गेले. यावेळी त्यांना संभाजीनगरवर प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘ किमान मान्यतेचा कार्यक्रम होता, त्यात हा भाग नव्हता. हा निर्णय शेवटचा कॅबिनेटमध्ये घेतला, तेव्हा आमच्याशी सुसंवाद नव्हता. निर्णय घेतल्यानंतर आम्हाला कळलं. निर्णय घेतल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मंत्रिमंडळाची एक कामाची पद्धत असते. त्यात मुख्यमंत्र्यांचा निर्णय अंतिम असतं. तिथं मतं व्यक्त केली जातात. पण अंतिम मत त्यांचं असतं. त्यावेळी मतं भिन्न होती. ही वस्तुस्थिती आहे…’

 ‘काँग्रेस-राष्ट्रवादी हे RSSचे’

औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री बैठकीला असतानाही हा निर्णय झाला. यासाठी खा. जलील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबाबदार धरलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकांना उल्लू बनवत आहेत. या लोकांचे कपडे काढले तर आतून RSS चे लोक सापडतील, अशी जहरी टीका खा. इम्तियाज जलील यांनी केली आहे. खा. जलील आणि काही सामाजिक संस्था आज औरंगाबादमध्ये संभाजीनगर नामांतराविरोधात मोठा मोर्चा काढणार आहेत.