मंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांचा बीडला जनता दरबार, कारण काय?

| Updated on: Feb 04, 2021 | 9:27 AM

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी बीडला जनता दरबारचं आयोजन केलं आहे. | Minister Dhananjay Munde janata Darbar in beed

मंत्री झाल्यापासून पहिल्यांदाच धनंजय मुंडे यांचा बीडला जनता दरबार, कारण काय?
धनंजय मुंडे
Follow us on

बीड : राष्ट्रवादीचे सगळे मंत्री दर आठवड्याला जनता दरबार घेऊन सामान्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्यांचे जनता दरबार मुंबईतील पक्ष कार्यालयात पार पडत असतात. मात्र सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे या आठवड्यापासून बीडलाही जनता दरबार भरवणार आहेत. (Minister Dhananjay Munde janata Darbar in beed)

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे हे शुक्रवार (05 फेब्रु.) रोजी दुपारी अडीज वाजता बीडच्या राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे जनता दरबार उपक्रमांतर्गत जिल्हा वासियांना भेटीसाठी उपलब्ध असणार आहेत. मंत्री झाल्यापासून धनंजय मुंडे यांचा बीडमध्ये हा पहिलाच जनता दरबार असल्याने तर्कवितर्क लावला जातोय. धनंजय मुंडे यांनी बीडला जनता दरबार का घेतला असावा, याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेनुसार सुरु असलेल्या जनता दरबार उपक्रमास मुंबई येथील पक्ष कार्यालयात दर गुरुवारी धनंजय मुंडे हे उपस्थित असतात. या ठिकाणी राज्यभरातून येणाऱ्या नागरिकांचे म्हणणे ऐकून त्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी धनंजय मुंडे प्रयत्न केरत असतात. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून धनंजय मुंडे वादाच्या भोवऱ्यात अडलेले असताना देखील त्यांनी मुंबईचा जनता दरबार चुकवलेला नाही. मग बीडला जनता दरबार घेण्याचं कारण काय असू शकतं, याविषयी राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

धनंजय मुंडे हे मुंबई व्यतिरिक्त त्यांच्या मतदारसंघात म्हणजेच परळीत नेहमी जनता दरबार उपक्रम आयोजित करून लोकांच्या भेटीसाठी, त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपलब्ध असतात. जागच्या जागीच प्रश्न निकाली काढणे हे मुंडेंच्या जनता दरबाराचे वैशिष्ट्य मानले जाते. मात्र पहिल्यांदाच मुंडे यांचा जनता दरबार बीडमध्ये भरविला जातोय. मंत्रिपद मिळवून वर्ष उलटले मात्र बीड मध्ये उद्या शुक्रवारी हा दरबार आयोजित केल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्क काढले जात आहेत.

बीडला जनता दरबार घेण्याचं कारण काय?

चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांची बीडच्या जनतेशी घट्ट नाळ आहे. हीच नाळ कायम रहावी आणि आपण जरी संकटात असलो तरी आपली जनता संकटात राहता कामा नये म्हणून धनंजय मुंडे यांनी बीडला जनता दरबार भरविल्याची चर्चा बीडच्या राजकीय वर्तुळात आहे.

शुक्रवारी दुपारी अडीज वाजता या जनता दरबाराला सुरुवात होणार आहे. हा उपक्रम आता दर महिन्याला राबविण्यात येईल, तसेच यावेळी भेटायला येणाऱ्या नागरिकांनी कोव्हिडविषयक नियमांचे पालन करून भेट घ्यावी, असे आवाहन धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाच्या वतीने केले आहे.

धनंजय मुंडे गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. अगोदर रेणू शर्मा आणि आता बुधवारी करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. त्यामुळे पक्षीय पातळीवरही मुंडे यांच्याविषयी काहीशी नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशी सगळी परिस्थिती जरी असली तरी त्यांचे राज्यभरातले समर्थक त्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करताना दिसून येत आहेत. मात्र आता स्वागत समारंभाच्या पुढे जाऊन कामातून आपल्या विरोधकांना उत्तर देण्याचा निर्णार मुंडे यांनी केलाय.

(Minister Dhananjay Munde janata Darbar in beed)

हे ही वाचा :

चित्रकूट बंगल्यात माझ्या मुलांना डांबलंय, धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीत करुणा शर्मांनी नेमकं काय म्हटलंय?

अखेर रेणू शर्मांची बहीण करुणा यांनीही मौन सोडलं, धनंजय मुंडेंविरोधात गंभीर तक्रार

करुणा शर्माबाबत धनंजय मुंडेंचा खुलासा, पण कोण आहेत करुणा शर्मा?

धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?