ममता बॅनर्जींना राष्ट्रवादीचा पाठिंबा, शरद पवार बंगालच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला जाण्याची शक्यता : नवाब मलिक

| Updated on: Mar 31, 2021 | 7:30 PM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ममता बॅनर्जी यांना पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली (Minister Nawab Malik Said NCP support Mamata Banerjee).

ममता बॅनर्जींना राष्ट्रवादीचा पाठिंबा, शरद पवार बंगालच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला जाण्याची शक्यता : नवाब मलिक
ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांचा फाईल फोटो
Follow us on

मुंबई : तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशातील सर्व विरोधी पक्षाच्या अध्यक्षांना समर्थन देण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे. ममता बॅनर्जी यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनाही पत्र प्राप्त झाले असून आमच्या पक्षाचा ममताजींना पाठिंबा असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली (Minister Nawab Malik Said NCP support Mamata Banerjee).

“शरद पवारसाहेबांचा 1 ते 3 एप्रिल असा पश्चिम बंगालचा दौरा होता. पण त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांना जाता येणार नाही. मात्र त्यांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाल्यास शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला पश्चिम बंगालला जातील”, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले (Minister Nawab Malik Said NCP support Mamata Banerjee).

ममता बॅनर्जींचे 15 नेत्यांना पत्र

पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचार शिगेला पोहोचलेला असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित येण्याचं आवाहन केलं आहे. ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासहीत प्रमुख विरोधी पक्षांच्या 15 नेत्यांना पत्रं लिहून हे आवाहन केलं आहे

ममता बॅनर्जी यांनी सोनिया गांधी, शरद पवार, डीएमकेचे एमके स्टॅलिन, सपा नेते अखिलेश यादव, राजद नेते तेजस्वी यादव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल, आंध्रचे मुख्यमंत्री जनग रेड्डी, झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक, वाय. एस. रेड्डी, माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला, माजी मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती आणि दीपांकर भट्टाचार्य यांना ममता बॅनर्जी यांनी पत्र लिहून मोदी विरोधातील लढाईत पाठबळ देण्याचं आवाहन केलं आहे. भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या विरोधात सर्वांनी संयुक्तपणे राष्ट्रीय पातळीवर एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी या पत्रातून केलं आहे.

पत्रात नेमकं काय?

यावेळी ममता बॅनर्जी यांनी नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ इंडिया (दुरुस्ती) विधेयकाचाही उल्लेख केला आहे. हे विधेयक संघ व्यवस्थेच्या विरोधात असल्याचं ममता बॅनर्जी यांनी पत्रात म्हटलं आहे. भाजप हे केवळ दिल्लीच्याबाबत करत नाही. तर संपूर्ण देशात हाच प्रकार सुरू आहे. गैर भाजपाशासित राज्यांमध्ये राज्यपालांच्या माध्यमातून समस्या निर्माण केल्या जात आहेत, असं सांगतानाच नियोजन आयोगाचं नाव नीती आयोग ठेवल्याबद्दलही त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

संबंधित बातम्या : भाजपच्या विरोधात एकत्र या, ममता बॅनर्जी यांचं सोनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंना पत्रं