जळगाव : (Cabinet Expansion) मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात आपला नंबर न लागल्याने (Eknath Shinde) शिंदे गटातील आमदार हे आता आपली भूमिका स्पष्ट मांडू लागले आहेत. आतापर्यंत जनेतीची कामे हेच आपले ध्येय म्हणणारे आमदार आता मंत्रिमंडळाच्या किमान दुसऱ्या टप्प्यात तरी वर्णी लागावी अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन दोन दिवसच उलटले असताना आता पारोळा मतदार संघाचे (Chimanrao Patil) आ. चिमणराव पाटील यांनी देखील आपण मंत्रिपदासाठी आशादायी असल्याचे म्हटले आहे. शिवाय मंत्रिमंडळात समावेश झाल्यास विकास कामेही झपाट्यात होतात असा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आतापर्यंत एकनाथ शिंदे म्हणातील तीच पुर्वदिशा म्हणणारे आमदार आता मंत्रिमंडळात सहभागी करावे अशीही मागणी करु लागले आहेत. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात कुणा-कुणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी प्रयत्न केले मात्र, पहिल्या यादीमध्ये समावेश असता तर कामाचा जोरही वाढला असता असेही चिमणराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत जनतेच्या कामातच आपले हित असे म्हणणारे नेते आता मंत्रिमंडळाच्या बाबतीत रस दाखवू लागले आहेत. शिंदे गटासह अपक्षांनाही पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नाही. त्यांना आता दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल अशी समजूतही काढली जात आहे. तर दुसरीकडे बंडामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्यांना संधी दिली गेल्याचे सांगितले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास कामासाठी निधीची पूर्तता केली जात नव्हती. पण आता शिंदे सरकार सत्तेत असून निधीचा तुटवड़ा भासणार नाही. अखेर जनतेची कामे झाली तर निवडुण आलेल्याचा उद्देश साध्य होतो. मात्र, गेल्या अडीच वर्षात जी कामे रखडली आहेत ती आता पूर्ण करणे हाच उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याचा आपल्याला विशेष आनंद झाल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे विकास कामात आता कोणताच अडसर नसल्याचेही म्हणाले आहेत.
पहिल्या टप्प्यात मंत्रिपदी वर्णी न लागल्याने आ. बच्चू कडू हे नाराज आहेत. आता त्यांची मनधरणी करण्यासाठी सर्व मंत्रिमडळ त्यांच्याकडे जाणार असल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. तर ज्यांना पहिल्या टप्प्यात संधी मिळाली नाही ते आता दुसऱ्या टप्प्यातील यादीकडे लक्ष ठेवून आहेत. एकीकडे मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर अजून खातेवाटप झाले नाही. त्यावरुनही तर्क-वितर्क लावले जात असनाताच दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात काय होणार याचे वेध लागले आहेत.