30 जेसीबीवरुन गुलालाच्या उधळणीवर रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

| Updated on: Nov 02, 2019 | 1:43 PM

एकीकडे रोहित पवार यांची मिरवणूक सुरु होती, तर दुसरीकडे शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत होते (Sharad Pawar). त्यामुळे रोहित पवार यांच्यावर काही प्रमाणात टीका झाली. त्याला रोहित पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

30 जेसीबीवरुन गुलालाच्या उधळणीवर रोहित पवारांची फेसबुक पोस्ट
Follow us on

मुंबई : आमदार रोहित पवार यांची विजयी मिरवणूक काल कर्जत-जामखेडमध्ये काढण्यात आली (Rohit Pawar Rally). तब्बल 30 जेसीबींच्या सहाय्याने गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला. एकीकडे रोहित पवार यांची मिरवणूक सुरु होती, तर दुसरीकडे शरद पवार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करत होते (Sharad Pawar). त्यामुळे रोहित पवार यांच्यावर काही प्रमाणात टीका झाली. त्याला रोहित पवार यांनी आज फेसबुकच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

रोहित पवारांची फेसबुक पोस्ट

“आपल्या आनंदामुळे अगदी एका व्यक्तीला जरी वाईट वाटलं, तर आपण त्या एका व्यक्तीचा विचार करायला हवां. हेच मी लहानपणापासून शिकलो. कालचा दिवस हा माझ्यासाठी आणि कर्जत जामखेडच्या सर्वसामान्य मतदारांसाठी विशेष होता. कर्जत जामखेड हे माझं घर आहे अस मी मानत आलेलो आहे. विजयी झाल्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यात आले. स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीस्थळास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिवाळीसाठी वेळ देत असताना परतीच्या मान्सूनमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांबद्दल माहिती गोळा करण्यात आली.”

“त्यानंतर मुंबईचे पक्षाचे समारंभ आटोपून मी विजयी झाल्यानंतर पहिल्यांदा जामखेडमध्ये पोहचलो. विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच पोहचल्यानंतर समजलं की, लोकांनी मोठ्या उत्साहात माझी मिरवणूक काढण्याची तयारी केली आहे. ही लोकं म्हणजे नेमके कोण, तर माझा विजय व्हावा म्हणून गेली सहा सात महिने रात्रीचा दिवस करणारी माझी हक्काची माणसं. अगदी दहा-दहा रुपये गोळा करुन त्यांनी गुलाल आणला होता. यात जशी सामान्य माणसं होती तसेच JCB असोशिएशन लोक देखील होते. त्यांनी आमच्या पद्धतीने तुमचा सत्कार करु असा आग्रह धरला. तो आग्रह मी मोडणार नव्हतोच कारण त्यांच्या भावना प्रामाणिक होत्या. मला नियोजित शेतकऱ्यांना भेटायला जायचं आहे, अस सांगितलं तर समोरून उत्तर आलं, तुम्ही आताही शेतकऱ्यांना भेटूनच आला आहात, मिरवणूक झाल्यानंतर देखील तुम्ही शेतकऱ्यांनाच भेटायला जाणार आहात फक्त आम्हाला तुमचे आताचे चार तास द्या. आम्हाला गेली २५ वर्ष गुलाल लावता आला नाही. आता नाही म्हणू नका.”

 

 

“सर्वांनी मिळून मोठ्या आनंदात मिरवणूक काढली. त्यांच्या आनंदात मी सहभागी झालो. पण यामध्ये कुठेही शेतकऱ्यांच्या भावना दूखावण्याचा हेतू नव्हता. मी बांधिलकी जपतो ती या मातीशी अन् लोकांशी. आपल्या आनंदामुळे एकाही व्यक्तीचा अपमान व्हावा, त्यांना वाईट वाटावं असा माझा कधीच हेतू नव्हता आणि भविष्यात देखील नसेल”, असं रोहित पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं.

“राहिला प्रश्न तो माझ्या सामाजिक कामांचा, तर ज्या स्वच्छ मनाने मी यापुर्वी काम करत होतो त्याच स्वच्छ मनाने आणि अधिक वेगाने सामाजिक काम यापुढे करत राहिलं. सर्वसामान्य लोक, कार्यकर्ते व हितचिंतक हेच माझं बळ आहे. कोणाला उत्तर देण्यासाठी नाही तर एकाही व्यक्तीला वाईट वाटू नये म्हणून अगदी स्वच्छ मनाने आपणासमोर या गोष्टी मांडतोय”, असं सांगत रोहित पवार यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकांना उत्तर दिलं.

पहिलीच निवडणूक आणि राम शिंदेंचा पराभव

रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि पहिल्याच निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्क्याने निवडूनही आले. त्यांनी भाजपच्या राम शिंदे यांना पराभूत केलं. ही राज्यातील सर्वात मोठ्या लढतींपैकी एक लढत होती. त्यानंतर काल (1 नोव्हेंबर) आमदार रोहित पवार हे निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्या मतदारसंघात गेले. यावेळी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं.