‘..तर रक्ताचे पाट वाहिले असते’, आमदार शंकरराव गडाख यांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचंही कौतुक

| Updated on: Jul 11, 2022 | 9:07 PM

राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते, असं वक्तव्य गडाख यांनी केलंय.

..तर रक्ताचे पाट वाहिले असते, आमदार शंकरराव गडाख यांचं वक्तव्य, उद्धव ठाकरेंच्या संयमी नेतृत्वाचंही कौतुक
शंकरराव गडाख, माजी मंत्री
Image Credit source: Google
Follow us on

अहमदनगर : एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना दुभंगलीय. शिवसेनेचे (Shivsena) तब्बल 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार सध्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. तर उरलेले 15 आमदार सध्या उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. त्यात अपक्ष आमदार आणि माजी मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांचा समावेश आहे. गडाख यांनी आज अहमदनगरमध्ये जाहीर भाषण केलं. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाचं तोंडभरुन कौतुक केलंय. इतकंच नाही तर राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे पाट वाहिले असते, असं वक्तव्य गडाख यांनी केलंय.

‘बोट दाखवेपर्यंत रक्ताचे वाट वाहिले असते’

शंकरराव गडाख म्हणाले की, उद्धवसाहेब हे अजिबात राजकीय व्यक्ती नाहीत. शिवसेना ही अतिशय जहाल संघटना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसैनिकांच्या रक्तात एक वेगळी ताकद आणि रग निर्माण केलीय. असं बंड होत असताना शिवसेनेसारखा पक्ष उद्धव ठाकरेंच्या हाती होती. राज्यात नव्हे तर देशात उद्धव ठाकरेंच्या जागी दुसरा नेता असता आणि शिवसेनेसारखी जहाल संघटना त्यांच्या हाती असती तर बोट दाखवेपर्यंत रक्ताचे वाट वाहिले असते. पण या माणसाने स्वत: कमीपणा घेऊन हे सगळं थांबवलं. त्यांनी संयमाने भूमिका घेतल्याने पुढे काय झालं ते आपण सगळ्यांनीच पाहिलं असल्याचं गडाख म्हणाले.

‘माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला’

राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. आजपर्यंत आपण गोव्यात असं झालं, तिकडे तसं झालं हे ऐकत होतो. मात्र, आपल्या राज्यातही तीच परिस्थिती आली. प्रचंड घालमेल मनात सुरु होती. काय निर्णय घ्यावा कळत नव्हते. मी यशवंतराव गडाख यांचा मुलगा असलो तरी माझ्या वाट्याला कायम संघर्ष आला. मी अपक्ष निवडून आलो तेव्हा तालुक्याच्या हिताचा निर्णय घेईन असं सांगितलं होतं. उद्धव ठाकरे यांनी मला संधी दिली. ते राजकीय व्यक्ती नव्हते म्हणून मला संधी दिली. हा तालुका भल्या भल्यांना घरी बसवणारा तालुका आहे. भावनिकतेवर चालणारा तालुका आहे.

शेवटच्या कॅबिनेटमध्ये आदित्य ठाकरे आणि मी आम्ही दोघेच होतो

मला काही आमदारांनी सांगितलं होतं हे सरकार जास्त टिकणार नाही. कारण, ज्यांच्यासोबत लढलो त्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसावे लागले, अखेर स्फोट झाला. मलाही गुवाहाटीवरुन फोन आला होता, अनेक आमदार येणार आहेत तु्म्ही देखील या. त्यावेळी आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम काय होईल तो होईल. त्यावेळी गडाखसाहेब उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरुन बोलले. शेवटच्या कॅबिनेटमध्ये आदित्य ठाकरे आणि मी आम्ही दोघेच होतो. सर्व घडामोडी सुरु होत्या, मात्र आपण स्थिर होतो, असंही शंकरराव गडाख यांनी सांगितलं.