शरद पवार म्हणाले शिवेंद्रराजे पक्षातच, पण काही तासातच भाजप प्रवेशाच्या हालचाली

| Updated on: Jul 29, 2019 | 11:55 PM

नुकत्याच सातारा राष्ट्रवादी भवनामध्ये विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. याकडेही शिवेंद्रराजेंनी (shivendra raje bhosale) पाठ फिरवली होती. त्यातच आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशासाठी आग्रह धरलाय.

शरद पवार म्हणाले शिवेंद्रराजे पक्षातच, पण काही तासातच भाजप प्रवेशाच्या हालचाली
Follow us on

सातारा : विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्‍वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात सध्या पक्षाची धाकधूक वाढली आहे. कारण सातारा- जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (shivendra raje bhosale) यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. नुकत्याच सातारा राष्ट्रवादी भवनामध्ये विधानसभेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या गेल्या. याकडेही शिवेंद्रराजेंनी (shivendra raje bhosale) पाठ फिरवली होती. त्यातच आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेशासाठी आग्रह धरलाय.

राष्ट्रवादीने जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक उमेदवारांचे ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवले होते. त्यानुसार 13 इच्छुकांनी ऑफलाईन, तर काही इच्छुकांनी ऑनलाईन अर्ज सादर केले. त्यामध्ये मात्र पक्षाच्या विद्यमान आमदारांपैकी केवळ शिवेंद्रराजे भोसले यांचाच अर्ज दाखल झालेला नसल्यामुळे सातारा, जावळीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीही बुचकळ्यात पडले.

मतदारसंघाचं हित जिथे असेल तिथे आपण जाणार असल्याचं शिवेंद्रराजेंनी स्पष्ट केलंय. यामुळे शिवेंद्रराजे पक्ष सोडणार असल्याच्या चर्चांना बळ मिळालंय. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवेंद्रराजे पक्षातच राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण त्यानंतर काही तासातच हालचाली सुरु झाल्या आहेत.

शिवेंद्रराजे भोसले यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखी शिवेंद्रराजेंनी भाजपा प्रवेश करावा अशी मागणी केली. यामुळे शिवेंद्रराजे यांनी कार्यकर्ते आणि मतदारसंघाच्या हिताचा निर्णय घेणार असल्याचं सांगितलंय. शिवेंद्रराजेंनी भाजपात प्रवेश केल्यास याचा मोठा फटका सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीला बसणार आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसलेंचा सातारा, जावळी, उत्तर कराड आणि कोरेगावच्या काही भागात मोठा जनसंपर्क आहे. याचा मोठा फटका ग्रामपंचायतींपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था यांना बसू शकतो. या ठिकाणी मोठ प्राबल्य असल्यामुळे आमदार शिवेंद्रराजेंची नेमकी काय भूमिका असेल त्याकडे लक्ष लागलंय.