Amit Thackeray | ‘राज’पुत्राच्या राजकीय कारकीर्दीची वर्षपूर्ती, बीएमसीच्या कसोटीसाठी अमित ठाकरे सज्ज

| Updated on: Feb 10, 2021 | 4:24 PM

ईशान्य मुंबईची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर देण्यात आली आहे. यानंतर अमित ठाकरे सक्रिय झालेले पाहायला मिळतात. (MNS Amit Thackeray One Year Report)

Amit Thackeray | राजपुत्राच्या राजकीय कारकीर्दीची वर्षपूर्ती, बीएमसीच्या कसोटीसाठी अमित ठाकरे सज्ज
मनसे नेते अमित ठाकरे
Follow us on

मुंबई : शिवसेनेकडून ठाकरे कुटुंबातील तिसरी पिढी असलेल्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना राजकारणात पुढे आणल्यानंतर आता मनसेकडून राजपुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) राजकारणात चांगलेच सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांच्या राजकारणातील सक्रिय प्रवेशाला नुकतीच वर्षपूर्ती झाली. त्यानिमित्ताने वर्षभरातील कारकीर्दीवर खास रिपोर्ट. (MNS Leader Amit Thackeray One Year Report card)

नवा झेंडा आणि नव्या अजेंड्यासह मनसेचे रिलाँचिंग करताना अमित ठाकरे पहिल्यांदाच मनसेच्या व्यासपीठावर सक्रिय दिसून आले होते. त्यावेळी अमित ठाकरे यांचे लाँचिंग झाले, तरी त्यानंतर ते कार्यकर्ते आणि सामान्य लोकांच्या भेटीगाठी वगळता फारसे सक्रिय दिसून आले नव्हते. मात्र, आता महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने त्यांच्यावर थेटपणे एखादी जबाबदारी टाकली. त्यामुळे आता अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची खऱ्या अर्थाने कसोटी लागणार आहे.

ईशान्य मुंबईची जबाबदारी

मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे त्यांनी आपली टीम तयार केली आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन बड्या नेत्यांवर अशी जबाबदारी देण्यात आली आहे. ईशान्य मुंबईची जबाबदारी अमित ठाकरे यांच्यावर देण्यात आली आहे. यानंतर अमित ठाकरे सक्रिय झालेले पाहायला मिळतात.

कार्यकर्ते-नेत्यांसोबत वन टू वन बैठका

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना पक्षाच्या नेतेपदी निवडल्यानंतर आता पहिल्यांदा ते मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सामोरे जात आहेत. त्यांच्यावरती ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या चार दिवसापासून अमित ठाकरे हे स्वतः या ठिकाणी जाऊन कार्यकर्ते-नेत्यांसोबत वन टू वन बैठका घेत आहेत.

मुलुंड मधील मनसेच्या शाखेत जाऊन अमित ठाकरे यांनी बैठका घेतल्या. कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजपुत्र अमित ठाकरे हे सक्रिय झालेले पाहायला मिळतात.

अमित ठाकरेंनी काय काय केलं?

1. करोना संकटकाळात शाळांनी, विशेषत सीबीएसई, आयसीएसई, आयबी या बोर्डाच्या इंग्रजी शाळांनी फीमध्ये वाढ केली. तसंच फी भरु न शकणा-या पालकांवर दबाव टाकला. याप्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी अमितजी ठाकरे यांनी पत्राद्वारे केली. (अमितजी यांनी हा विषय घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिका-यांनी आपापल्या परिसरातील प्रत्येक शाळेच्या विश्वस्तांची भेट घेऊन पालकांनी आर्थिक पिळवणूक करु नका, असं पत्र दिलं.)

2. शासन आदेश मराठीतच काढले जावेत याकडे अमितजी ठाकरे यांनी सरकारचं/ प्रशासनाचं लक्ष वेधलं – “टाळेबंदीशी संबंधित शासन आदेश राज्यातील सर्वसामान्य जनतेला समजावा अशी जर राज्य सरकारची खरंच इच्छा असेल तर त्यासाठी इंग्रजीचा वापर करून कसं चालेल? म्हणूनच ‘शासन आदेश मराठीतच हवा’ या मागणीसाठी आम्ही आज मुख्य सचिवांना पत्र लिहिलं. आता यापुढे तरी राज्य सरकारचे सर्वच्या सर्व शासन आदेश मराठीत प्रसिद्ध केले जातील, अशी आशा बाळगूया. शासन आदेशातील मराठी भाषा क्लिष्ट, किचकट नसेल, तर सर्वांना समजेल अशी सहज, सोपी असेल अशीही अपेक्षा बाळगूया” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

3. राज्यातील आशा वर्कर्स आणि आशा गट प्रवर्तक यांच्या मानधनवाढीचा प्रश्न गेली अनेक वर्षं रखडला होता. केवळ १,५००- २,००० रुपयांच्या मानधनावर आशा वर्कर्स काम करत होता. अमितजी यांना काही आशा वर्कर्स भेटल्यानंतर त्यांनी आरोग्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले. तसंच, अर्थमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर दोनच दिवसांत आशा वर्कर्सच्या मानधनात रु २,००० तर आशा गट प्रवर्तकांच्या मानधनात रु. ३,००० इतकी वाढ करण्याचा निर्णय कॅबिनेट मिटिंगमध्ये घेण्यात आला. हा एक ऐतिहासिक निर्णय होता. राज्यातील सुमारे ७२ हजार आशा वर्कर्सना या निर्णयामुळे दिलासा मिळाला.

4. कोविड संकटकाळात विविध रुग्णालयांमध्ये निवासी डॉक्टर्स महत्वाची सेवा बजावत आहेत. त्यांच्यावरची पदव्युत्तर परीक्षेची (डिप्लोमा आणि डिग्री) टांगती तलवार मानसिक तणाव निर्माण करणारी होती. यासंदर्भात अमितजींनी सरकारला पत्र लिहिलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हाच विषय पंतप्रधानांकडे मांडला. अमितजींमुळे निवासी डॉक्टरांच्या समस्यांना वाचा फुटली. (MNS Leader Amit Thackeray One Year Report card)

5. कोविड संकटकाळात बंधपत्रित डॉक्टर्स आणि नर्सेस यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यामुळे या डॉक्टर आणि नर्सेसचं मासिक मानधन रु १५,००० ते रु. २०,००० ने कमी झालं. अमितजी ठाकरे यांनी हा विषय आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला. नुसतं पत्र लिहून ते थांबले नाहीत, तर त्यांनी आरोग्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे बंधपत्रित डॉक्टरांचा पगार पूर्ववत करण्याचा निर्णय सरकारने घेतला. बंधपत्रित नर्सेसचा पगार अद्याप पूर्ववत झाला नसला तरी त्यासाठी अमितजींचा पाठपुरावा सुरु आहे.

6. एमपीएससी-युपीएससी परीक्षांची पूर्वतयारी करणारे शेकडो विद्यार्थी अनेक ठिकाणी, विशेषत पुण्यात अडकले होते. त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या गावी जाता यावं, यासाठी एसटी उपलब्ध करुन देण्याची विनंती अमितजींनी मुख्यमंत्र्यांना फोनद्वारे केली. मनसेचे कार्यकर्ते यांनी आरक्षित केलेल्या बसेस तसंच एसटी बसेस यांच्यामुळे हे शेकडो विद्यार्थी घरी सुखरुप पोहोचले.

7. कोविडचा संसर्ग सुरु झाल्यावर टाळेबंदीच्या पहिल्या- दुस-या आठवड्यातच डॉक्टरांना पीपीई किट आणि मास्क उपलब्ध होत नसल्याच्या बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांची दखल घेऊन अमितजी ठाकरे यांनी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेला शेकडो पीपीई किट, मास्क उपलब्ध करुन दिले.

संबंधित बातम्या   

‘डॉक्टर हेच देव’, त्यांच्या मानधनात कपात होणार नाही याची काळजी घ्यावी, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

अमित ठाकरेंनी वर्षभरात काय केलं? मनसेकडून रिपोर्ट कार्ड जारी

(MNS Leader Amit Thackeray One Year Report card)