‘उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय’

| Updated on: Apr 06, 2021 | 1:17 PM

महाविकासआघाडी सरकारवरील आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या कोंडीविषयी प्रश्न विचारण्यात आला. | Raj Thackeray Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष
Follow us on

मुंबई: उद्धव ठाकरे यांच्या हातामध्ये राज्य आलंय की उद्धव ठाकरे यांच्यावर राज्य आलंय, असा प्रश्न सध्या अनेकांना पडला असल्याचे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. राज ठाकरे (Raj Thackeray) यांना राज्य सरकारवर एकापाठोपाठ होणाऱ्या आरोपासंदर्भात विचारणा करण्यात आली. त्यावर राज ठाकरे यांनी खास शैलीत उत्तर दिले. (MNS Raj Thackeray on CM Uddhav Thackeray)

ते मंगळवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांना महाविकासआघाडी सरकारवरील आरोपांमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या कोंडीविषयी प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज ठाकरे यांनी म्हटले की, नुकताच मला एका मित्राने मेसेज पाठवला होता. उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की, उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय, असा मजकूर त्यामध्ये होता. राज ठाकरे यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

विनोदाची पार्श्वभूमी काय?

लपाछुपी, पकडापकडी यासारखे खेळ लहानपणी खेळताना एखाद्यावर राज्य आलं, असं आपण म्हणतो. त्यावरुन शाब्दिक कोटी करणारा एक विनोद सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. तोच राज ठाकरेंनी वाचून दाखवला

राज ठाकरेंकडून उद्धव ठाकरेंची पाठराखण

या संपूर्ण पत्रकारपरिषदेत राज ठाकरे कधी नव्हे ते उद्धव ठाकरे यांची एकप्रकारे पाठराखण करताना दिसले. उद्धव ठाकरे यांच्या कोरोनासंदर्भातील उपाययोजना सकारात्मक असल्याचे राज यांनी म्हटले.

तसेच परमबीर सिंह प्रकरणामुळे ठाकरे सरकार अपयशी ठरले असे वाटते का, असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, पोलीस दलात बदल्यांचे बाजार होणे ही काही नवी बाब नाही. आपण सरकारला वेळ दिला पाहिजे. अनिल देशमुख पैसे गोळा करण्यासंदर्भात जे बोलले, ते लांछनास्पदच आहे. पण परमबीर सिंह यांना 100 कोटींचा साक्षात्कार पद गेल्यानंतरच का झाला, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

‘मंत्र्यांकडून चुका होतात म्हणूनच विरोधक सरकार पाडण्याची भाषा करतात’

भाजपचे नेते सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप महाविकासआघाडीचे नेते करत असतात. पण सरकार अशाप्रकारे पडायला काय इमारत आहे का? पिलर काढले आणि सरकार पडले असे होणार आहे का? तुमचे मंत्री चुका करतात म्हणूनच विरोधकांना संधी मिळते ना, असे खडेबोल राज ठाकरे यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांना सुनावले.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray PC LIVE : दहावी-बारावी विद्यार्थ्यांना प्रमोट करा, राज ठाकरे यांची पत्रकार परिषद

किंबहुना’ वापरलं तर चालेल ना; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शैलीवर मिश्किल टिप्पणी

महाराष्ट्रात कोरोना का वाढला?; राज ठाकरे यांनी सांगितली दोन कारणं!

(MNS Raj Thackeray on CM Uddhav Thackeray)