उद्धव ठाकरेंच्या नाकाखाली फ्री काश्मीरचे फलक, फडणवीसांचा हल्लाबोल

| Updated on: Jan 07, 2020 | 10:06 AM

या पोस्टरवर 'FREE KASHMIR (फ्री काश्मीर)' असं लिहिलं होतं. या पोस्टरचा भाजपनेच नाही तर काँग्रेस नेत्यांनीही निषेध केला आहे.

उद्धव ठाकरेंच्या नाकाखाली फ्री काश्मीरचे फलक, फडणवीसांचा हल्लाबोल
Follow us on

मुंबई : दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन सुरु आहे (JNU Violence). याच विरोध प्रदर्शनादरम्यान दिसलेल्या एका पोस्टरमुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या पोस्टरवर ‘FREE KASHMIR (फ्री काश्मीर)’ असं लिहिलं होतं. या पोस्टरचा भाजपनेच नाही तर काँग्रेस नेत्यांनीही निषेध केला आहे. राजकीय नेत्यांनीच नाही तर सिनेसृष्टीतील कलाकारांनीही या पोस्टरवर आक्षेप घेतला आहे. जेएनयू हिंसाचार विरोधातील आंदोलनात अशा प्रकारच्या पोस्टरचं काय काम आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे (Free Kashmir Poster).

राज्याचे माजी मुख्य़मंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या पोस्टरवर आक्षेप घेत ठाकरे सरकारवर निशाणा साधला. ‘उद्धवजी तुम्ही हे फ्री काश्मीर भारतविरोधी अभियान कसं सहन करु शकता’, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला.

फडणवीसांनी एएनआयचा फोटो ट्वीट करत लिहिलं, “हा विरोध कुणासाठी आहे? फ्री काश्मीरच्या घोषणा इथे का होत आहेत? मुंबईत अशा प्रकारच्या फुटीरतावादी घटकांना आपण कसं सहन करु शकतो? मुख्यमंत्री कार्यालयापासून 2 किलोमीटर अंतरावर आझादी गटाकडून ‘फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्या जातात? उद्धवजी तुमच्या नाकाखाली अशाप्रकारे फ्री काश्मीर भारतविरोधी मोहीम सुरु आहे, हे तुम्ही सहन करणार आहात का?”

मुंबईच्या गेट-वे ऑफ इंडियासमोर रविवारी रात्रीपासून जेएनयू हिंसाचाराविरोधात आंदोनल सुरु आहे. यामध्ये विद्यार्थी, कलाकार आणि समाजातील इतर नागरिक जेएनयू हिंसाचाराविरोधात एकवटले आहेत. तसेच, या प्रकरणी दोषींवर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळी या ठिकाणी आंदोलनादरम्यान एक मुलगी हातात एक पोस्टर घेऊन उभी होती, ज्यावर मोठ मोठ्या अक्षरात ‘फ्री काश्मीर’ लिहिलेलं होतं. हे पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट होताच ते व्हायरल झालं. अनेकांनी या पोस्टरचा विरोध केला आहे.

आंदोलनाची दिशाभूल होऊ शकते : संजय निरुपम

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीही या पोस्टरवर आक्षेप दर्शवला आहे. अशा पोस्टमुळे देशभरात सुरु असलेलं विद्यार्थी आंदोलन बदनाम होऊ शकतं, आंदोलकांची दिशाभूल होऊ शकते, असं ट्वीट त्यांनी केलं.

याविषयी आंदोलकांना सावध राहावं लागेल. जेएनयू हिंसाचाराचं काश्मीरच्या मुक्ततेशी काय संबंध? कोण आहेत हे लोक? कुणी यांना गेट-वे ञफ इंडियावर पाठवलं. सरकारने याची चौकशी करायला हवी, असं संजय निरुपम यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटलं.

पाहा व्हिडीओ :