हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र; मेट्रोच्या वादात मुंबईच्या महापौरांची उडी

| Updated on: Nov 03, 2020 | 11:33 AM

महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे, असा आरोप किशोरी पेडणेकरांनी केला आहे. (Kishori Pednekar comment Central Government letter on Metro carshed)

हे तर महाराष्ट्राची कोंडी करण्याचं षडयंत्र; मेट्रोच्या वादात मुंबईच्या महापौरांची उडी
mayor kishori pednekar
Follow us on

मुंबई : आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्र विरुद्ध राज्य सरकार संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे. मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. जर ती केंद्राची जागा आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. मात्र आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना, अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे, असा आरोप मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी याबाबतची प्रतिक्रिया दिली.  (Mumbai Mayor Kishori Pednekar comment Central Government letter on Kanjurmarg Metro carshed)

“मेट्रो कारशेड संपूर्ण महाराष्ट्रचं नाही तर संपूर्ण जगाला किती खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे हे दिसतं आहे. जर केंद्राची जागा आहे, तर ती जागा महाराष्ट्राच्या कामासाठी मागत आहोत. अशा अनेक जागा आहेत, त्या केंद्राने दिल्या असतील. पण कुरघोड्या करणं असे काही होत आहे. तर मराठीतील म्हणीप्रमाणे आई नीट जेवू देईना अन् बाप भीक मागू देईना अशी महाराष्ट्राची अवस्था करण्याचं षडयंत्र हे रचलं जात आहे,” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

“केंद्राने मिठागराची जागा म्हटलं असेल तरी केंद्र म्हटलं की सर्व आहे. अशा अनेक जागा आहेत. अशा अनेक जागा आहेत, त्या आपण दिलेल्या आहेत. आम्ही ज्या कामासाठी ती जागा मागत आहोत, ते काम लोकांचंच आहे. मीठागराच्या अशा अनेक जागा आहे. त्या डावलण्यात आल्या आहे. आपण बाजूला कुठे तरी मिठागर करु शकतो,” असे किशोरी पेडणकेरांनी सांगितले.

“पण महाराष्ट्राला कोंडीत पकडायचं आहे तर असे निर्णय होत राहणार. पण आमचं मंत्रिमंडळ सक्षम आहे. यावर नक्की चांगला तोडगा निघेल,” असेही महापौरांनी म्हटलं.

आरे हे जंगल आहे. त्या ठिकाणच्या स्थानिकांनी विरोध केला होता. मात्र याबाबत नक्की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलतील. जर मोदी हे छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करतात तर ते महाराष्ट्रावरही करतात. त्यामुळे जे निर्णय महाराष्ट्राच्या हिताचे असतील, त्यावर नक्कीच विचारविनिमय केला जाईल, असेही किशोरी पेडणेकरांनी सांगितलं.

मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी आरेमधील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता मेट्रोच्या कारशेडवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार आमनेसामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण मेट्रो कारशेडची कांजूरमार्गची जागा ही केंद्राची असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. नुकतंच केंद्राने याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिलं आहे.

“कांजूरमार्गची जागा MMRDA ला देण्याचा निर्णय रद्द करा. ही जागा मिठागराची आहे. आम्ही त्यावरील आमचा हक्क सोडलेला नाही. यापूर्वीही MMRDA चा प्रस्ताव आम्ही फेटाळला होता. त्यामुळे आमच्या परस्पर कारशेड उभारणं चुकीचं आहे. त्यामुळे MMRDA ने या कारशेडचे काम त्वरित थांबवा,” असेही केंद्राने या पत्रात लिहिलं आहे. (Mumbai Mayor Kishori Pednekar comment Central Government letter on Kanjurmarg Metro carshed)

संबंधित बातम्या : 

मेट्रो कारशेडवरुन केंद्र आणि राज्य सरकार आमनेसामने; कांजूरमार्गची जागा आमची, केंद्राचा दावा

मोठी बातमी: मेट्रोची कारशेड आरेत नव्हे कांजूरमार्गला होणार; उद्धव ठाकरेंची घोषणा