‘महापालिकेत 20 वर्षे सत्ता, पण रस्त्यावर गाडी व्हायब्रेट मोडवर जाते’, मुंबई महापालिका अर्थसंकल्पावरुन मुनगंटीवारांचा शिवसेनेवर निशाणा

रस्ते विकासासाठी बजेट वाढले पण पावसाळ्यात मुंबईला लोक तुंबई म्हणतात. 20 वर्षे हे महापालिकेत सत्तेत आहेत. पण रस्त्यावरुन गाडी जाताना व्हायब्रेट मोडवर जाते. इतर महानगरात जेवढे खड्डे नाहीत त्यापेक्षा जास्त खड्डे मुंबईत आहेत. मुंबई महापालिकेच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो असतो, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीय.

महापालिकेत 20 वर्षे सत्ता, पण रस्त्यावर गाडी व्हायब्रेट मोडवर जाते, मुंबई महापालिका अर्थसंकल्पावरुन मुनगंटीवारांचा शिवसेनेवर निशाणा
सुधीर मुनगंटीवार, मुंबई महापालिका
| Edited By: | Updated on: Feb 03, 2022 | 5:49 PM

मुंबई : मुंबई महापालिकेचा 2022-2023 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (BMC budget) आज सादर करण्यात आला. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी 45 हजार 949 कोटींचा अर्थसंकल्प जाहीर केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात 17.70 टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. गेल्यावर्षी 39 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. महापालिका निवडणुका (BMC election) होऊ घातल्याने निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पातून मुंबईकरांचा आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. या अर्थसंकल्पावर माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खोचक टीका केलीय.

‘मुंबईच्या रस्त्यावरून जाताना गाडी व्हायब्रेट मोडवर जाते’

यंदाच्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातून आभास निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेलाय. शिवसेनेची सत्ता यावी आणि शिवसेनेची इच्छा पूर्ण व्हावी असा हा अर्थसंकल्प आहे. रस्ते विकासासाठी बजेट वाढले पण पावसाळ्यात मुंबईला लोक तुंबई म्हणतात. 20 वर्षे हे महापालिकेत सत्तेत आहेत. पण रस्त्यावरुन गाडी जाताना व्हायब्रेट मोडवर जाते. इतर महानगरात जेवढे खड्डे नाहीत त्यापेक्षा जास्त खड्डे मुंबईत आहेत. मुंबई महापालिकेच्या जाहिरातीमध्ये मुख्यमंत्र्यांचा फोटो असतो, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीय.

‘किराणा दुकानात वाईन विकणाऱ्यांना निवडणुकीत फाईन बसेल’

शिवसेना मुंबईत पायाभूत सुविधा देण्यात अपयशी ठरली. पेंग्विन आणले तर पर्यटन वाढेल असं वाटत असेल तर आपण कुठेतरी चुकत आहोत. मोठमोठ्या घोषणा झाल्या पण सर्व फोल ठरल्या. मुंबईकरांच्या मनात समाधानाचा अभाव असेल तर त्याला फक्त आणि फक्त शिवसेना जबाबदार आहे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केलीय. इतकंच नाही तर किराणा दुकानात वाईन विकणाऱ्यांना निवडणुकीत मात्र फाईन बसेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

परमवीर सिंहांच्या गौप्यस्फोटावरुन ठाकरे सरकारवर निशाणा

परमवीर सिंह यांनी ईडी चौकशीदरम्यान केलेल्या सनसनाटी खुलास्यांबाबतही मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. ईडीच्या चौकशीत गंभीर विषय समोर येत आहेत. सर्व पोलीस यंत्रणा संपवण्याचा प्रयत्न केला गेला. यादीनुसार बदल्या घडल्या तर याची नोंद सर्वोच्च न्यायालयानं घेऊन व्यक्ती कितीही मोठा असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मी याबाबत विधानसभेत प्रश्न विचारताना सर्वोच्च न्यायालयाने सु-मोटो अंतर्गत कारवाई करण्याची मागणी करणार आहे. सचिन वाझे तर यांना सख्या भावाप्रमाणे वाटत होता. ते विधानसभेत त्याची बाजू मांडत होते. हे लोक सचिन वाझेचे वकील बनले होते, अशी टीकाही मुनगंटीवार यांनी केलीय.

इतर बातम्या :

BMC Budget 2022: बजेटमध्ये मुंबईकरांसाठी काहीच नाही, गुलाबी स्वप्न दाखवणारा अर्थसंकल्प; भाजपसह काँग्रेसचीही शिवसेनेवर टीका

BMC BUDGET: मुंबई महापालिकेचा डिजीटल शिक्षणावर भर, विद्यार्थ्यांना मसूरडाळ, हरभरे आणि तांदूळही देणार