नुकसान भरपाई अन् सहवेदना हे उत्तर नव्हे, सरकार प्रायश्चित्त घेणार का?; ओडिसातील अपघातावर सामनातून भाष्य

| Updated on: Jun 05, 2023 | 8:15 AM

Saamana Editorial on Coromandel Express Accident : ओडिसातील अपघातावर सामनातून भाष्य; केंद्र सरकारवर टीकास्त्र

नुकसान भरपाई अन् सहवेदना हे उत्तर नव्हे, सरकार प्रायश्चित्त घेणार का?; ओडिसातील अपघातावर सामनातून भाष्य
Follow us on

मुंबई : ओडिसामधल्या बालासोरमध्ये 2 जूनला भीषण रेल्वे अपघात झाला. यात 275 लोकांचा मृत्यू झालाय. यावर आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आला आहे. “तांत्रिक बिघाड, मानवी चूक किंवा घसरलेले डबे यावर खापर फोडून सरकारला बालासोर रेल्वे दुर्घटनेच्या जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. अपघात हा अपघात असतो असे म्हणून हातही वर करता येणार नाहीत”, असं सामनात म्हणण्यात आलं आहे.

पंतप्रधानांनी घटनास्थळी तातडीने भेट दिली, जखमींची विचारपूस केली, सांत्वन केले, मदतकार्य करणाऱ्या यंत्रणांना धीर दिला, हे सगळे ठीक असले तरी सरकार म्हणून तुमच्या उत्तरदायित्वाचे काय? नुकसानभरपाईच्या रकमा आणि सहवेदना हे ना या प्रश्नाचे उत्तर आहे ना प्रायश्चित्त. या भीषण आणि भयंकर दुर्घटनेचे प्रायश्चित्त सरकार घेणार की नाही? अपघातग्रस्तांच्या किंकाळय़ा, आक्रोश आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फोडलेला टाहो हाच सवाल करीत आहे, असं म्हणत सामनातून या अपघातावर भाष्य करण्यात आलं आहे.

ओडिशामधील बालासोर येथील भयंकर रेल्वे अपघाताने संपूर्ण देशच स्तब्ध झाला आहे. प्रत्येकाचा थरकाप उडाला आहे. देशवासीयांची मने हेलावून गेली आहेत. त्याचवेळी सुरक्षित रेल्वे प्रवासाचे दावे फोल ठरल्यामुळे संतापाचा ज्वालामुखीही प्रत्येकाच्या मनात खदखदत आहे. मोदी सरकारने रेल्वे अपघातविरोधी ‘संरक्षण कवचा’च्या टिऱ्या बडविल्या होत्या. मात्र बालासोरच्या रेल्वे अपघाताने त्याच्या ठिकऱ्या उडविल्या आहेत, असं म्हणत सामनातून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली आहे.

मोदी सरकार आल्यापासून रेल्वेचा विकास आणि सुरक्षितता यासंदर्भात जे दावे ठोकले जात आहेत, त्या दाव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही दुर्घटना आहे. बुलेट ट्रेन, ‘वंदे भारत’ ट्रेन्स असे रेल्वे विकासाचे बरेच फुगे गेल्या सहा-सात वर्षांत हवेत सोडले गेले. त्या सर्व फुग्यांमधील हवा शुक्रवारच्या अपघाताने काढली आहे, असं म्हणत मोदी सरकारवर टीका करण्यात आली आहे.

दोन रेल्वेंमध्ये टक्कर होऊ नये यासाठी ‘संरक्षण कवचा’चा उदोउदो रेल्वेमंत्र्यांनी गेल्या वर्षी केला होता. हे संरक्षण कवच म्हणजे रेल्वे दुर्घटना रोखणारी मोठी क्रांती (भक्तांच्या भाषेत ‘मास्टर स्ट्रोक’) असून एकाच रेल्वेमार्गावर समोरासमोर ट्रेन्स आल्या तरी या संरक्षण प्रणालीमुळे त्या आधीच थांबतील आणि टक्कर टळेल असे सांगितले गेले होते. स्वतः रेल्वेमंत्र्यांनी त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते. मग तरीही शुक्रवारची भीषण रेल्वे दुर्घटना घडलीच कशी?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.