Bank Job: 3 बड्या बँकांमधून 7,700 हून अधिक कर्मचारी कपात; आता नव्याने नोकर भरती झाली तर एका अटीवर
भारतातील तीन खासगी बँकांमध्ये नोकरकपात झाली आहे. जवळपास 7,700 लोकांना कमी केले आहे. यामागे ठोस कारण काय आहे ते जाणून घ्या...

banking sector
देशातील बँकिंग क्षेत्रात मोठा बदल घडणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. AI, ऑटोमेशन आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे बँकांमधील कामकाजाचा वेग वाढल्यामुळे त्याचा परिणाम आता कर्मचारी संख्येवर होणार आहे. विशेष म्हणजे देशातील तीन आघाडीच्या खासगी बँका HDFC Bank, Axis Bank आणि Kotak Mahindra Bank यांच्या एकूण कर्मचारी संख्येत कमी झाली आहे. बँकांचे म्हणणे असे आहे की,”ही घट मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेल्या कर्मचारी कपातीमुळे नाहीच आहे तर तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे मनुष्यबळाची गरज पूर्वीपेक्षा वेगळ्या स्वरूपाची झाली आहे.”
तीन बँकांमधील एकूण कर्मचारी संख्या 3,93,028 वरून 3,85,300 इतकी झाली. म्हणजेच एका वर्षात सुमारे 7,700 हून अधिक कर्मचारी कमी झाल्याचे समजत आहे. टक्केवारीचा विचार केला तर 2 टक्के घट झाली आहे. ही घट अशा काळात झाली जेव्हा डिजिटल बँकिंगने जोर धरला आहे, ग्राहकांची संख्या सातत्याने वाढते आहे आणि देशभरात नवीन शाखाही उघडल्या जात असूनही कर्मचाऱ्यांची गरज मात्र बँकांना भासत नाहीये.
HDFC Bank मध्ये नऊ वर्षांनंतर प्रथमच कर्मचारी संख्या घटली
HDFC बँकेतील 3,343 कर्मचारी कमी झाले. यावर HDFC Bank ने स्पष्ट केले की, “ही घट कर्मचारी कपातीमुळे झालेली नसून AI आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे बॅक-ऑफिसमधील अनेक प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोप्या झाल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना बॅकएंडमधून ग्राहकांशी थेट संबंधित कामांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
Kotak Mahindra Bank : विक्रमी भरती, तरी कर्मचारी संख्या घटली
बँकेतील एकूण कर्मचारी संख्या 1,269 ने कमी झाली. बँकेच्या म्हणण्यानुसार, “आता भरतीचे स्वरूप बदलले आहे. सध्या AI, क्लाउड टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग, Advanced Technology क्षेत्रांतील तज्ज्ञांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. तसेच एका विभागातील कर्मचाऱ्यांचा दुसऱ्या विभागात अधिक प्रभावी वापर केल्यामुळेही एकूण कर्मचारी संख्या कमी झाली आहे.
Axis Bank मध्ये सलग दुसऱ्या वर्षी घट
बँकेत एकूण 3,116 कर्मचाऱ्यांची घट झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या बँकेचा व्यवसाय वाढत असतानाही कर्मचारी संख्या कमी झाल्याचे चित्र दिसते. बँकेच्या म्हणण्यानुसार, “AI मुळे नोकरकपात झालेली नाही तर सध्या AI चा वापर मुख्यतः कामाचा वेग वाढवण्यासाठी, प्रक्रिया अधिक सुरळितपणे आणि सेवा सुधारण्यासाठी केला जात आहे.”
ग्राहकांवर काय परिणाम होईल?
ग्राहकांसाठी हा बदल त्रासदायक न ठरता आता सकारात्मक ठरू शकतो. AI मुळे कर्ज मंजुरीची प्रक्रिया, ग्राहक सेवा, तक्रार निवारण, व्यवहारांची पडताळणी आणि इतर बँकिंग सेवा अधिक वेगवान आणि अचूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. HDFC Bank, Axis Bank आणि Kotak Mahindra Bank या बँकेत मोठीी भरतीही होत आहे. म्हणजेच नोकरकपातही एकाचवेळी आणि भरतीही एकाचवेळी होत आहे. व्यवसाय वाढतो आहे, शाखा वाढत आहेत आणि भरतीही सुरू आहे. मात्र AI, ऑटोमेशन आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळाची गरज फक्त बदलत आहे.
Follow Us
