Sanjay Raut | ते खरं बोलतायत, मुख्यमंत्री भेटतच नसल्याच्या देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Jun 13, 2022 | 10:37 AM

भुयार यांची भावना प्रामाणिक असून काही दोन-चार लोकांमुळे मुख्यमंत्र्यांचा थेट आमदारांशी संपर्क होऊ शकत नसल्याचं राऊतांनीही मान्य केलं. तसंच यापुढे हा प्रकार होणार नाही, याची काळजी घेऊ असं आश्वासन भुयारांना दिलं. 

Sanjay Raut | ते खरं बोलतायत, मुख्यमंत्री भेटतच नसल्याच्या देवेंद्र भुयारांच्या वक्तव्यावर राऊतांचं मोठं वक्तव्य
आमदार देवेंद्र भुयार, संजय राऊत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः राज्यसभा निवडणुकीत ज्यांनी दगाफटका केलेले आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) हे प्रामाणिक असून ते खरं बोलत असल्याबाबतचं मोठं वक्तव्य संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानात काही अपक्ष आमदारांनी दगा दिल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यात मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांचंही नाव घेण्यात आलं होतं. मात्र देवेंद्र भुयार यांनी आपल्या मनातील नाराजी बोलून दाखवली. त्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि संजय राऊतांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान, भुयारांची समजूत काढण्यात आली. संजय राऊत यांनी या भेटीबद्दलची प्रतिक्रिया आज पत्रकारांसमोर मांडली. देवेंद्र भुयारांनी ज्या भावना बोलून दाखवल्या त्या खऱ्या आहेत. त्यांच्या भावना आज मी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.

‘मुख्यमंत्री भेटतच नाहीत’

राज्यसभा निवडणुकीत दगाबाजीचा आरोप असलेल्या देवेंद्र भुयारांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे केले. ते म्हणाले, ‘ अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचताच येत नाही. याउलट उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोणत्याही आमदाराचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे म्हणणे ऐकून घेतात. मी आज सकाळीच पहाटे पाच वाजता भेटीसाठी मी अजित पवारांना फोन केला होता. त्यांनी मला लगेच 7.45 ची वेळ दिली असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसंच मी दगाबाजी केल्याचा आरोप खोटा असून उद्या संजय राऊतांनी मतदान करू नका असे सांगितले तरीही मी महाविकास आघाडीलाच मतदान करेन, कारण मला भाजपची विचारसरणी पटत नाही, असे देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केले होते.

भुयारांना राऊतांचं आश्वासन काय?

देवेंद्र भुयारांशी भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्या भावना समजून घेतल्या. केवळ निवडणुकांपुरतंच अपक्ष आमदारांना विचारलं जातं. त्यानंतर विसर पडतो, मुख्यमंत्र्यांपर्यंत आमचा थेट संपर्क होऊ शकत नाहीत, असं मत यावेळी भुयारांनी व्यक्त केलं. यावर संजय राऊतांनीदेखील हे मत मान्य केलं. काही दोन-चार लोकांमुळे मुख्यमंत्र्यांचा थेट आमदारांशी संपर्क होऊ शकत नसल्याचं राऊतांनीही मान्य केलं. तसंच यापुढे हा प्रकार होणार नाही, याची काळजी घेऊ असं आश्वासन भुयारांना दिलं.

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्री काय भूमिका घेणार?

संजय राऊत यांनी देवेंद्र भुयारांची भेट घेतल्यानंतर ते खरं बोलत असल्याचं मत राऊतांनी व्यक्त केलं आहे. तसंच त्यांच्या भावना आज मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलंय. म्हणजेच अपक्ष आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटतच नाहीत, असा भुयारांनी केलेला आरोप राऊतांनाही मान्य झालाय, हेच यातून दिसतंय. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या भेटीनंतर भुयारांबाबत मुख्यमंत्री काय भूमिका घेतील, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.