Nagar Panchayat Election Result : ‘निकाल काँग्रेससाठी समाधानकारक, जनतेनं भाजपला नाकारलं’, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Jan 19, 2022 | 6:24 PM

राज्यात नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे तर कोकणात पक्षाने खाते खोलले आहे. आजचा निकाला पाहता आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलीय.

Nagar Panchayat Election Result : निकाल काँग्रेससाठी समाधानकारक, जनतेनं भाजपला नाकारलं, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Follow us on

मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निकालात महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. तर भाजप दुसऱ्या स्थानी आहे. काँग्रेस तिसऱ्या तर शिवसेना चौथ्या क्रमांकावर असल्याचं या निकालातून स्पष्ट झालं. दरम्यान, राज्यात नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी सुधारली आहे. विदर्भात काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे तर कोकणात पक्षाने खाते खोलले आहे. आजचा निकाला पाहता आम्हाला समाधानकारक जागा मिळाल्या आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलीय.

पटोले म्हणाले की, नगर पंचायत निवडणुकीच्या निकालाने राज्यातील जनतेने आपला कौल महाविकास आघाडीच्या बाजूने दिला आहे, तर भारतीय जनता पक्षाला नाकारले आहे. भारतीय जनता पक्षाने मागील वेळी 600 पेक्षा जास्त जागा जिंकल्या होत्या. त्या आता 300 वर खाली घसरल्या आहेत. आम्ही 17 नगरपंचायतीवरून 22 वर गेलो आहोत. काँग्रेस पक्षाने 300 हून अधिक जागा जिंकल्या असून काँग्रेस विचारांच्या स्थानिक आघाड्यांनी ही चांगले यश मिळवले आहे. भाजपचे 105 आमदार आहेत व आमचे 44 आहेत तरीही काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे, असा दावा पटोले यांनी केलाय.

‘स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय योग्यच’

देशाचा आणि राज्याचा विकास करून सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याने जनतेने आमच्यावर विश्वास टाकला आहे. आम्ही त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवू. भंडाऱ्याचा निकाल अजून येत आहे, तिथेही काँग्रेसच क्रमांक एकचा पक्ष राहील आणि सत्ता स्थापन करेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तो योग्य होता हे जनतेने आजच्या निकालातून दाखवून दिले आहे. स्वबळावर निवडणूक लढवल्यामुळे पूर्वी आघाडीमुळे आम्ही जिथे निवडणुका लढवत नव्हतो तिथेही आता काँग्रेस संघटना वाढणार आहे. या निवडणुकीत काँग्रेसचे चिन्ह पुन्हा गावागावांत पोहोचले आहे. आगामी काळातील निवडणुकांत याचा पक्षाला मोठा फायदा होणार आहे. नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेतील विजय हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेहनत आणि निष्ठेचे फळ आहे. या निवडणुकीत विजयासाठी कठोर परिश्रम घेणा-या सर्व कार्यकर्त्यांचे व विजयी उमेदवारांचे पटोले यांनी अभिनंदन केले आहे. तसेच काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल मतदारांचेही आभार मानले आहेत.

‘भाजप मिस कॉल करुन, फसवून एक नंबरचा पक्ष’

त्याचबरोबर पटोले यांनी भाजप आणि चंद्रकांत पाटील यांचा समाचार घेतला. भाजपा हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे हा त्यांचा दावाच हास्यास्पद आहे. मिस कॉल करून, फसवून एक नंबरचा पक्ष असल्याचा दावा करणारा भाजपा जगातील पहिला पक्ष आहे. जनता त्यांचा भूलथापांना बळी पडत नाही हेच नगरपंचायतीच्या निकालावरुन दिसून आल्याचा टोला त्यांनी लगावलाय.

इतर बातम्या :

नगर पंचायत निवडणूक निकालावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, भाजपच क्रमांक एकचा पक्ष असल्याचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसच राज्यातील नंबर एकचा पक्ष, जयंत पाटलांकडून कार्यकर्त्यांचे अभिनंदन, तर मलिकांचा भाजपवर निशाणा