मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला, ‘भारत बंद’वेळी नाना पटोलेंचा घणाघात

| Updated on: Sep 27, 2021 | 6:38 PM

मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय.

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला, भारत बंदवेळी नाना पटोलेंचा घणाघात
'भारत बंद'निमित्त नाना पटोलेंच्या नेतृत्वात अकोल्यात रॅली
Follow us on

मुंबई : केंद्रातील मोदी सरकारविरोधात आज देशभरात भारत बंद पुकारण्यात आला. त्यात काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष सहभागी झाले होते. अकोल्यात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या रॅलीचं आयोजन करण्यात आलं. ‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश रसातळाला गेला आहे. शेतकरी, कामगार, कष्टकरी, सामान्य माणसांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारचे शेतकरीविरोधी धोरण, कामगारविरोधी धोरण, बेरोजगारांच्या विरोधातील धोरण, गरिबांच्याविरोधातील धोरणांना विरोध करण्यासाठी ही लढाई आहे. सामान्य जनतेला न्याय मिळेपर्यंत हा संघर्ष सुरुच राहिल’, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलाय. (Nana Patole criticizes Modi government, Bike rally led by Patole in Akola)

केंद्र सरकारविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देत काँग्रेस पक्षाने सक्रीय भाग घेतला. अकोल्यात नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली. यावेळी नाना पटोले यांनी रिक्षा चालवली. या रॅलीत अकोला शहर जिल्हाध्यक्ष, माजी आमदार बबनराव चौधरी, महापालिकेतील विरोधी पक्षनेते साजीद पठाण, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

‘पंतप्रधान मोदींना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत’

प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, तीन कृषी कायद्याविरोधात देशातील शेतकरी आंदोलन करत आहे. एका वर्षापासून हे आंदोलन सुरुच आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या वेदना दिसत नाहीत. कृषी कायदे, कामगार कायद्यात बदल करुन शेतकरी, कामगारांना भांडवलदारांचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. मोदी सरकराच्या काळात फक्त दोन चार उद्योगपती मित्रांचा फायदा होत असून 130 कोटी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेलाचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत परंतु मोदी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत नाही.

‘कुंभकर्णी केंद्र सरकारला शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही’

अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले की, केंद्रातील मोदी सरकारने लादलेले तीन कृषी कायदे रद्द करावेत म्हणून एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी वर्षभरापासून ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलनात जवळपास 500 शेतकऱ्यांचे निधन झाले. परंतू केंद्रातील कुंभकर्णी सरकारला मात्र या शेतकऱ्यांचा आवाज ऐकू येत नाही. या काळ्या कृषी कायद्याने देशातील शेती व शेतकरी उद्ध्वस्त करुन त्याला भांडवलदाराचे गुलाम बनवण्याचे काम मोदी सरकार करत आहे. कामगार कायद्यात बदल करून कामगारांचे हक्क व अधिकार काढून घेतले आहेत. नवीन कामगार कायदेसुद्धा उद्योगपतीधार्जिणे आहेत. कामगारांना भांडलदारांच्या दावणीला बांधण्याचे पाप केंद्र सरकारने केल्याचा आरोप पटोलेंनी केलाय.

कोणत्या प्रश्नांवर भारत बंद?

पेट्रोल, डिझेल, एलपीपी गॅस, खाद्यतेलाचे दर प्रचंड महाग झाले आहेत. लोकांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप मोदी सरकारने केले आहे. बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. सुशिक्षित तरुणांच्या भविष्याचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पोळकच ठरले असून ज्या नोकऱ्या होत्या त्याही कमी होत आहेत. उद्योगधंदे बंद पडून बेरोजगारीत वाढ होत आहे. मोदी सरकारच्या काळात 45 वर्षातील सर्वात जास्त बेरोजगारी झाली आहे. या सर्वाला केंद्र सरकारची धोरणे कारणीभूत आहेत. या प्रश्नांवर केंद्र सरकारच्या विरोधात भारत बंदच्या रुपाने एल्गार पुकारलेला आहे.

दरम्यान आज धुळे येथे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील, हातकणंगले येथे आ. राजू आवळे, बुलढाणा येथे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी भारत बंदमध्ये सहभाग घेतला तर चंद्रपूर, नागपूर, भंडारा, नाशिक, लातूर, सोलापूर, कोल्हापूरसह राज्यातील सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी भारत बंदमध्ये काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने भाग घेत मोदी सरकारच्या कारभाराचा निषेध केला.

इतर बातम्या :

उद्धव ठाकरे म्हणाले, नंतर कॅप्टनला मैदान साफ करायला जावं लागतं, कनेक्शन काय?

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल

Nana Patole criticizes Modi government, Bike rally led by Patole in Akola