राफेल घोटाळ्याच्या चौकशीला मोदी सरकार का घाबरते? नाना पटोले यांचा सवाल

| Updated on: Jul 03, 2021 | 8:22 PM

फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते, तशी भारतातही या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

राफेल घोटाळ्याच्या चौकशीला मोदी सरकार का घाबरते? नाना पटोले यांचा सवाल
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

मुंबई :राफेल फायटर जेटच्या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याची बाब उघड करून काँग्रेसने या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी लावून धरली. परंतु मोदी सरकारने हे प्रकरण चौकशीविनाच गुंडाळले. हा संपूर्ण व्यवहारच संशयास्पद असल्याने फ्रान्स सरकारने आता या राफेल घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात केलीय. या प्रकरणात करोडो रुपयांचा घोटाळा झालाय. फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते, तशी भारतातही या घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करावी,” अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे (Nana Patole demand Modi government to do JPC inquiry of Rafale deal).

नाना पटोले म्हणाले, “मोदी सरकारने 2016 मध्ये फ्रांसच्या डसॉल्ट एव्हिएशन कंपनीकडून 36 राफेल विमानांची खरेदी केली. काँग्रेसच्या काळात जे विमान 526 कोटी रूपयांना खरेदी करण्याचे ठरले होते. तेच विमान मोदी सरकारने 1670 कोटी रूपयांना खरेदी केले. काँग्रेस सरकारने 123 राफेल खरेदीचा व्यवहार करत होते, पण मोदी सरकारने तर 36 राफेलचाच व्यवहार केला आणि जनतेच्या तिजोरीतून 41 हजार 205 कोटी रूपये अतिरिक्त मोजले. ही विमाने महाग का झाली? या व्यवहारात कोणा-कोणाचे खिसे भरले? याचे उत्तर मोदी सरकारने आजपर्यंत दिलेले नाही.”

“डसॉल्टने भारतातील मध्यस्थाला एक दशलक्ष युरो एवढी रक्कम दिली. २०१७ मध्ये डसॉल्ट ग्रुपच्या बँक खात्यातून ‘गिफ्ट टू क्लाएंट’ म्हणून ही रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. फ्रान्समधील भ्रष्टाचारविरोधी तपास संस्था AFA ने डसॉल्टच्या बँक खात्यांचे ऑडिट केल्यानंतर ही बाब समोर आली आहे. यावरून राफेल खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध झाले आहे. आज फ्रान्समध्ये राफेल घोटाळ्याची चौकशी सुरु झाली आहे, या चौकशीत फ्रान्सच्या आजी माजी राष्ट्राध्यक्षांची चौकशी होणार आहे मग भारतातच चौकशीला मोदी सरकार का घाबरत आहे?” असा सवाल नाना पटोले यांनी केलाय.

नाना पटोले म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदुस्थान एरॉनॉटिक्स या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीला मिळणारे 30 हजार कोटींचे कंत्राट, राफेल खरेदी कराराच्या 12 दिवसापूर्वी स्थापन झालेल्या रिलायन्स डिफेन्स या खाजगी कंपनीला देऊन 1 लाख कोटी रुपयांचे लाईफ सायकल कंत्राट देऊन अनिल अंबानीचा फायदा करुन दिला. राफेल लढाऊ विमान खरेदीत देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. या प्रकरणी मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात खोटी माहिती देऊन व असत्य बोलून न्यायालयाची दिशाभूलही केली आहे. सोबतच संसदेच्या विशेष अधिकाराचे उल्लंघनही केले आहे. राफेल घोटाळा हा देशाचे नुकसान करणारा, देशाची सुरक्षा धोक्यात आणणारा आहे.”

“राफेल घोटाळ्याप्रकरणी खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. काँग्रेस पक्षानेही या खरेदी व्यवहाराची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी केली होती. चौकशी केल्यास या प्रकरणाचे सत्य समोर येऊन खरे चोर सापडतील,” असे नाना पटोले म्हणाले.

हेही वाचा :

फ्रान्स सरकारनेही राफेलची चौकशी सुरू केलीय, आता मोदी सरकार करणार का? काँग्रेसचा सवाल

राफेल कराराच्या फाईल चोरीला गेल्याच नाहीत, सरकारचा दावा!

16 नको, 15 मिनिटंच द्या, मोदी उघडे पडतील: राहुल गांधी

व्हिडीओ पाहा :

Nana Patole demand Modi government to do JPC inquiry of Rafale deal