शरद पवारांचा महाविकास आघाडीवर भर, तरीही नाना पटोलेंची स्वबळाचीच भाषा?

| Updated on: Jun 10, 2021 | 5:06 PM

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र जोमाने काम करु, असं पवार यांनी म्हटलंय. त्यावर विचारलं असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढील निवडणुकांबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नसल्याचं म्हटलंय.

शरद पवारांचा महाविकास आघाडीवर भर, तरीही नाना पटोलेंची स्वबळाचीच भाषा?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
Follow us on

बुलडाणा : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. मात्र, अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वबळावर लढताना पाहायला मिळंत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी कायम असणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र जोमाने काम करु, असं पवार यांनी म्हटलंय. त्यावर विचारलं असता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढील निवडणुकांबाबत अद्याप कुठलाही प्रस्ताव नसल्याचं म्हटलंय. (Nana Patole’s reply to Sharad Pawar’s statement on Maha Vikas Aghadi)

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या मिशन विदर्भ अंतर्गत बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी बोलताना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुढील निवडणुकांसाठी अद्याप कुठलाही प्रस्ताव नाही. मात्र, काँग्रेस पक्षाची स्वबळाची तयारी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे शरद पवार यांच्या महाविकास आघाडीच्या वक्तव्यानंतरही पटोले यांनी स्वबळाचाच नारा दिल्याचं पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आगामी निवडणुकीसंदर्भात अद्याप कोणताही प्रस्ताव आलेल नाही. आमची स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. नंतर प्रस्ताव आल्यावर ठरवू, असं पटोले यांनी म्हटलंय.

पवार नेमकं काय म्हणाले?

राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. त्या दिवसापासून हे सरकार टिकण्याबाबत सतत चर्चा होत होती. किती दिवस? किती आठवडे? किती महिने?, एखादं वर्ष हे सरकार टिकेल, अशी चर्चा होत होती. पण आता ती चर्चा होत नाही. काल-परवा थोडीबहुत चर्चा झाली. पण मला त्याची चिंता वाटत नाही. राज्याचं शिष्टमंडळ मोदींना भेटलं. त्यावेळी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. दोन्ही नेते स्वतंत्र बसले. काही चर्चा विचारविनियम केला. कुणी काही करो, पण लगेच वेगवेगळ्या प्रकारच्या शंका वावड्या उठवल्या गेल्या. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत शिवसेना आली आहे. सेनेसोबत कधी काम केलं नाही. महाराष्ट्र अनेक वर्षापासून सेनेला पाहतो आहे. त्यानुसार सेना विश्वास असणारा पक्ष आहे. कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेना भूमिका सोडणार नाही. कुणी असं काही मांडत असेल तर ते वेगळ्या नंदन वनात राहत आहेत, असं म्हणावे लागेल, असं सांगतानाच हे सरकार पाच वर्षे टिकेल. नुसतंच पाच वर्षे टिकणार नाही तर उद्याच्या लोकसभा- विधानसभेला हे सरकार जोमानं काम करेल. या बद्दल माझ्या मनात शंका नाही, असं पवारांनी सांगितलं. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत हे तिन्ही पक्ष एकत्रित येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

संबंधित बातम्या : 

VIDEO: विधानसभा, लोकसभाही महाविकास आघाडी एकत्रित लढणार?; शरद पवारांचं मोठं विधान, वाचा सविस्तर

शिवसेना हा विश्वास असणारा पक्ष, राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांचं प्रशस्तीपत्र

Nana Patole’s reply to Sharad Pawar’s statement on Maha Vikas Aghadi