Narayan Rane Arrests : नारायण राणे यांना अखेर अटक, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर रत्नागिरीत कारवाई

नारायण राणे यांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना अटक करण्यात आली आहे. मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Narayan Rane Arrests : नारायण राणे यांना अखेर अटक, मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्यानंतर रत्नागिरीत कारवाई
Narayan Rane
ReporterSameer Bhise | Edited By: Anish Bendre | Updated on: Aug 24, 2021 | 3:49 PM

रत्नागिरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांना कानाखाली लगावण्याचं वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अखेर अटक झाली आहे. नारायण राणेंविरुद्ध नाशिक, पुणे, रायगड अशा विविध ठिकाणी गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर नाशिक आणि पुणे पोलिसांनी कोकणात पथकं पाठवली होती. अखेर पोलिसांनी रत्नागिरीतील संगमेश्वर येथून नारायण राणे यांना अटक केली. त्याआधी नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तातडीने सुनावणी करण्यास नकार देत जामीन अर्ज फेटाळल्याने नारायण राणे यांना अटक केली.

नारायण राणेंच्या अटकेची प्रक्रिया कशी झाली?

नारायण राणे यांच्यावर रत्नागिरीत कारवाई होईल, रत्नागिरी पोलीस हे राणे यांच्यावर अटकेची कारवाई करतील आणि प्रकरण नाशिक पोलिसांकडे वर्ग करुन नाशिक पोलीस त्यांना कोर्टात हजर करतील, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी दिली होती. त्याप्रमाणे बंद दरवाजाआड पोलिसांनी नारायण राणेंना त्यांच्यावर लावलेल्या कलमांची आणि गुन्ह्याच्या स्वरुपाची माहिती देण्यात आली. वैद्यकीय तपासणी केली असता नारायण राणेंचे ब्लड प्रेशर आणि शुगर वाढल्याची माहिती भाजप नेते प्रमोद जठार यांनी दिली. त्यानंतर जवळपास तासाभराच्या ताणाताणीनंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली.

मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीत पोलिसांनी ताब्यात घेतलं. यावेळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात राणेंना कोर्टात घेऊन जाण्यात आले.

नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते?

नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हीरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हीरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता.

मुख्यमंत्र्यांना कानाखाली खेचण्याची भाषा, नारायण राणेंचं वक्तव्य जसंच्या तसं

‘त्यांचं अॅडव्हाईज कोण, त्यांनाच काही कळत नाही. ते काय आम्हाला अॅडव्हाईज करणार? ते काय डॉक्टर आहेत का? तिसऱ्या लाटेचा कुठून आवाज आला त्यांना? आणि ती पण लहान मुलांना? अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. त्याला बोलायचा अधिकार तरी आहे का? बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव आणि बोल म्हणावं. त्या दिवशी नाय का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती. हे काय, देशाच्या स्वातंत्र्य दिनाची तुम्हाला माहिती नसावी?’ अशा शब्दात नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली होती.

नारायण राणेंविरोधात कोणते आरोप?

नाशिक सायबर पोलीस स्टेशनमध्ये नारायण राणे यांच्याविरोधात कलम 500, 505 (2), 153-ब (1) (क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांबाबत बदनामीकारक वक्तव्य करणे, समाजात शत्रुत्व आणि द्वेषाची भावना निर्माण करणे, राज्यात विविध गटांत तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करणे, मुख्यमंत्र्यांवर बलप्रयोग करण्यास प्रवृत्त होतील असे वक्तव्य करणे यासारखे आरोप राणेंवर ठेवण्यात आले आहेत. गुन्ह्याचं गांभीर्य आणि व्यापकता लक्षात घेत अटक करण्यासाठी पोलिसांची टीम तयार करण्यात आली. नाशिक पोलीस उपायुक्त संजय बरकुंड, तपास अधिकारी आनंदा वाघ यांच्या अध्यक्षतेत टीमने कारवाई केली.

नारायण राणे यांच्याविरोधात कुठे कुठे गुन्हे दाखल?

रायगड
महाड
नाशिक
औरंगाबाद
पुणे

संबंधित बातम्या :

नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली खेचली असती, आता राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, नारायण राणेंना अटक करा, नाशिक पोलीस आयुक्तांचे निर्देश

Follow Us