राम कदम, तुमची अवस्था कावीळग्रस्तासारखी, आधी विधानसभेचे नियम समजून घ्या : नवाब मलिक

| Updated on: Dec 14, 2019 | 8:08 AM

आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्यं करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत, असा टोला आमदार नवाब मलिक यांनी लगावला.

राम कदम, तुमची अवस्था कावीळग्रस्तासारखी, आधी विधानसभेचे नियम समजून घ्या : नवाब मलिक
Follow us on

मुंबई : कावीळ झालेल्या व्यक्तीला सगळं जग पिवळं दिसतं, तशीच काहीशी अवस्था भाजपचे आमदार राम कदम यांची झालेली दिसते, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार नवाब मलिक यांनी (Nawab Malik on Ram Kadam) केली. सरकार विधानसभेत आमदारांना प्रश्न विचारण्याची संधी देत नसल्याचा आरोप राम कदम यांनी केला होता.

आमदार राम कदम यांनी चुकीची वक्तव्यं करण्याआधी विधानसभेतील कामकाजाचे नियम समजून घ्यावेत, असा टोला आमदार नवाब मलिक यांनी लगावला.

विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान उपस्थित करायचे प्रश्न (LAQ) 30 दिवस आधी देणे अपेक्षित असते. विधानसभा गठीत झाल्यानंतर तीस दिवसांचा अवधी मिळाला नसल्याने ते प्रश्न विचारु शकत नाहीत. मात्र सदनात लक्षवेधीद्वारे आमदार प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात, याची माहितीही नवाब मलिक यांनी करुन दिली.

कामकाज सल्लागार समितीच्या (BAC) अजेंड्यानुसार हा निर्णय घेण्यात आला असून त्याला सर्व पक्षांचे गटनेते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे, याची आठवणही नवाब मलिक यांनी राम कदम यांना करुन दिली आहे. भाजपला याची माहिती नाही किंवा खोटा प्रचार करण्याचा त्यांचा अजेंडा आहे, असा दावाही नवाब मलिक यांनी (Nawab Malik on Ram Kadam) केला.

दरम्यान, नवाब मलिक हे महाराष्ट्राची दिशाभूल करत आहेत. विधानसभेचे नियम जगजाहीर आहेत. मात्र आमदारांना तारांकित प्रश्न विचारण्यापासून रोखले. ही सरकारची नियोजनशून्यता आहे. कामकाज सल्लागार समिती तारांकित प्रश्नांपासून आमदारांना रोखण्यासाठी नव्हती, असंही कदम म्हणाले.