देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे सिद्ध होतंय; नवाब मलिकांची खोचक टीका

| Updated on: May 22, 2021 | 1:39 PM

तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या कोकणाला पॅकेज मिळण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. (nawab malik slams devendra fadnavis over tauktae cyclone package)

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे सिद्ध होतंय; नवाब मलिकांची खोचक टीका
nawab malik
Follow us on

मुंबई: तौक्ते वादळाचा फटका बसलेल्या कोकणाला पॅकेज मिळण्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच. परंतु, महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, असं सांगतानाच मात्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागले आहे, अशी खोचक टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. (nawab malik slams devendra fadnavis over tauktae cyclone package)

नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही टीका केली. विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत आहे हे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा, प्रशासन कोकणातील नुकसानीचा अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरुपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडींग ऑर्डरपेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त मदत देण्याची राज्यसरकारची भूमिका असेल, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

फडणवीसांना टोला

देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रसरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. मात्र फडणवीस केंद्राकडे आग्रह धरत नाही आणि राज्यसरकार काय देणार यावर देवेंद्र फडणवीस बोलत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. फडणवीस महाराष्ट्रासोबत आहेत की, भाजप नेत्यांना वाचवायला लागले आहेत हे त्यांनी सांगावे, असं ते म्हणाले.

आम्ही भरपाई देणारच आहोत

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले नाहीत. मात्र गुजरातला 1 हजार कोटीचे पॅकेज दिले. आत्ता जनता प्रश्न निर्माण करू लागल्यावर आमच्यावर प्रश्न निर्माण केला जात आहे. आम्ही भरपाई देणारच आहोत पण आधी फडणवीस यांनी मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. महाराष्ट्राला जास्त मदत मिळवून दिली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

राज्यपाल निर्णय घेतीलच

यावेळी त्यांनी विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीवरही भाष्य केलं. ‘त्या’ कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला असल्याचे मत मलिक यांनी व्यक्त केले. दरम्यान जनहित याचिकेवर कोर्टाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील व कोर्टाला कळवतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

विधानपरिषदेवर 12 आमदारांच्या नियुक्तीबाबत कॅबिनेटने राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला 7 महिने होत आले तरी निर्णय घेतलेला नाही. मात्र जनहित याचिकेवर सुनावणी करताना कोर्टाने ही फाईल ड्रॉव्हरमध्ये ठेवण्यासाठी आहे की निर्णय घेण्यासाठी अशी विचारणा केली आहे. त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार याची वाट पहावी लागणार असल्याचे ते म्हणाले. (nawab malik slams devendra fadnavis over tauktae cyclone package)

 

संबंधित बातम्या:

मग केंद्र सरकारला सांगा राज्य सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लावा; नितेश राणेंचा टोला

एकनाथ शिंदेंचं कौतुक, त्यांनी मदत तरी केली, उद्धवजी कपड्याची इस्त्री न मोडता कोकणातून परतले,भाजपचे टोमणे

प्रत्येक आपत्तीत राजकारण करण्याचा काही नेत्यांना महारोग; आशिष शेलार यांची घणाघाती टीका

(nawab malik slams devendra fadnavis over tauktae cyclone package)