जेव्हा व्यापाऱ्यांवर वेळ येईल, तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवू, अंकुश काकडेंचा संताप

| Updated on: Dec 08, 2020 | 2:20 PM

महाविकासआघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल," असा इशारा अंकुश काकडे यांनी दिला आहे. (Ankush Kakade on Pune Bharat Bandh Andolan) 

जेव्हा व्यापाऱ्यांवर वेळ येईल, तेव्हा त्यांना त्यांची जागा दाखवू, अंकुश काकडेंचा संताप
Follow us on

पुणे : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आज (8 डिसेंबर) पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये व्यापारी संघटनांनी देखील सहभागी व्हावं, असं आवाहन करण्यात आलं होतं. या बंदमध्ये सहभागी असलेल्या राजकीय पक्षांनी हे आवाहन केलं होतं. पण पुण्यातील व्यापारी संघटनांनी सुरुवातीला या बंदमध्ये सहभागी होण्याचं नाकारलं होतं. व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या भूमिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी जोरदार टीका केली आहे. “जेव्हा व्यापाऱ्यांवर ही वेळ येईल, तेव्हा महाविकासआघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल,” असा इशारा अंकुश काकडे यांनी दिला आहे. (Ankush Kakade on Pune Bharat Bandh Andolan)

अंकुश काकडे नेमकं काय म्हणाले?

“व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी याची नोंद घ्यावी की, त्यांच्यावर जेव्हा वेळ येईल तेव्हा महाविकासआघाडी सरकार त्यांना त्यांची जागा दाखवून देईल. शरद पवार यांनी व्यापाऱ्यांना त्यांच्या प्रकल्पासाठी पाच हजार एकर जागा मिळवून देण्याचा प्रयत्न चालवला आहे. मात्र त्यांना त्या उपकारांची जाणीव नाही,” अशी टीकाही अंकुश काकडे यांनी केली.

“भारत बंदच्या पार्श्वभूमीवर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी पत्रक काढलं होतं. या पत्रकात आम्ही आमची दुकान उघडी ठेऊ, पण तुमच्या मोर्चात सहभागी होऊ,” असे म्हटलं आहे. यावरुन अंकुश काकडेंनी टीका केली आहे.

“आम्हाला व्यापाऱ्यांच्या पाठिंब्याची गरज नाही. तुमचा जर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा होता तर चार तास दुकानं बंद ठेवायची होती. पण तुम्ही चार तासही दुकानं बंद ठेऊ शकत नाही. त्यामुळे फत्तेचंद रांका यांनी याची नोंद घ्यावी. जेव्हा तुमच्यावर वेळ येईल, तेव्हा महाआघाडीचे सरकार तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल,” असे अंकुश काकडे म्हणाले.

“पुण्यातील या व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. ट्राफीकची समस्या आहे. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यापाऱ्यांच्या समस्यांसाठी बैठक घेतली होती. त्यानंतर शहराच्या बाहेर पाच हजार एकरमध्ये शेतकऱ्यांना जागा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण व्यापाऱ्यांना या उपकारांची जाणीव नाही. मी सगळ्या व्यापाऱ्यांबद्दल बोलत नाही, तर व्यापाऱ्यांच्या नेत्यांबद्दल बोलतोय,” असा घणाघात अंकुश काकडे यांनी केली.

दरम्यान यानंतर आंदोलकांचा मोर्चा पुण्यातील अलका चौकातून महात्मा फुले मंडईकडे जाणार असल्याने किमान दुपारपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय व्यापाऱ्यांना घ्यावा लागला. (Ankush Kakade on Pune Bharat Bandh Andolan)

संबंधित बातम्या : 

डाव बदलले तरी लबाडांचे घाव तेच आहेत, आशिष शेलारांचा घणाघात