भुजबळांचा संजय राऊतांना पाठिंबा, म्हणाले, ‘एकत्र लढलं तर भाजपाला रोखणे शक्य’

| Updated on: Dec 26, 2020 | 11:40 AM

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपविरोधी पक्ष जर एकमताने यूपीएच्या पंखाखाली आले तर भाजपला रोखणे शक्य आहे, असं मत छगन भुजबळ यांनी मांडलं आहे.

भुजबळांचा संजय राऊतांना पाठिंबा, म्हणाले, एकत्र लढलं तर भाजपाला रोखणे शक्य
Follow us on

नाशिक : भाजपला रोखण्यासाठी विरोधी पक्षांनी ताकदीने एकत्र आलं पाहिजे त्याशिवाय भाजपचा वारु रोखणार नाही, अशी रोखठोक भूमिका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी मांडली होती. त्यांच्या याच मताशी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सहमती दर्शवली आहे. “संजय राऊतांनी लिहिलेला अग्रलेख खरोखर उद्वेगामुळे आला आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपविरोधी पक्ष जर एकमताने यूपीएच्या पंखाखाली आले तर भाजपला रोखणे शक्य आहे”, असं मत छगन भुजबळ यांनी मांडलं आहे. (NCp Chhagan Bhujbal On Sanjay Raut Saamana Editorial)

“यूपीए आणि आणखी काही घटक पक्ष एकत्र आले तर निश्चित देशातली परिस्थिती बदलू शकते. भाजपचा वारु जर रोखायचा असेल तर भाजपविरोधी सगळ्या पक्षांनी एकत्र यायला हवं. जर हे पक्ष एकत्र आले तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात नक्की यश येईल”, असं भुजबळ म्हणाले.

“संजय राऊतांनी आज ज्या मुद्द्यावर अग्रलेख लिहिला तो मुद्दा बरोबर आहे. राजकीयदृष्ट्या भाजपला जर प्रबळ आव्हान द्यायचं असेल तर विविध राज्यातील प्रमुख भाजपविरोधी पक्षांनी यूपीएमध्ये सामिल होऊन भाजपविरोधातली लढाई अधिक तीव्र करायला हवी”, असं छगन भुजबळ म्हणाले.

नाथाभाऊंना ईडीची नोटीस येणारच होती

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी ईडीने नोटीस पाठवलेली आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अगदी काही महिन्यांतच त्यांना ईडीची नोटीस आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.याचविषयी भुजबळांना विचारलं असता त्यांना ईडीची नोटीस येणारच होती, असं म्हणत त्यांनी भाजपवर याप्रकरणी निशाणा साधला. विरोधकांना दाबण्यासाठी भाजप अश्या प्रकारचं हीन राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली.

चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरात जावं नाहीतर कुठेही जावं

शुक्रवारी पुण्यातल्या कार्यक्रमात बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष तथा कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी मी लवकरच कोल्हापूरला परत जाईन, असं म्हटलं. त्यावर बोलताना भुजबळांनी चंद्रकांत पाटलांना टोमणा लगावला. “चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूरला जायचं की आणखी कुठे या त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी कुठेही जावं”, असं भुजबळ म्हणाले

भाजपविरोधी पक्षांनी यूपीएच्या पंखाखाली यावं- राऊत

“सगळे भाजपविरोधक यूपीएत सामील झाल्याशिवाय विरोधी पक्षाचे बाण सरकारच्या वर्मी लागणार नाहीत. विरोधी पक्षांची अवस्था म्हणजे ओसाड गावची पाटीलकी सांभाळण्यासारखी झाली आहे. या पाटीलकीला कोणी गांभीर्याने घेत नाही. म्हणून 30 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी निर्णायकी अवस्थेत बसला आहे. विरोधकांना ओसाड गावची डागडुजी तात्काळ करावीच लागेल”, अशी रोखठोक भूमिका आजच्या सामना अग्रलेखातून राऊत यांनी मांडली होती.

(NCp Chhagan Bhujbal On Sanjay Raut Saamana Editorial)

संबंधित बातम्या

राहुल गांधींची मेहनत वाखणण्याजोगी पण कुठेतरी ते कमी पडतायत, राऊतांचा धडाकेबाज अग्रलेख

संजय राऊतांचा मूड बदलला, भाजपऐवजी यूपीएला सल्ले, चिमटे आणि टोमणे