देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी

| Updated on: Nov 10, 2020 | 6:30 PM

तेजस्वी यादव यांना संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीपासून लांब राहिलो. | bihar election results 2020

देवेंद्र फडणवीसांमुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला, शरद पवारांची मिष्किल टिप्पणी
Follow us on

पुणे: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शाब्दिक चिमटा काढला. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला, अशी मिष्किल टिप्पणी शरद पवार यांनी केली. (Sharad Pawar on Bihar Election results 2020)

शरद पवार यांनी मंगळवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य केले. या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळाल्या. मात्र, नितीश कुमार यांचे फार नुकसान होण्याची भीती होती, तसे घडले नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव यांचे कौतुकही केले. बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही. ही निवडणूक मुख्यत्वेकरुन नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी होती. तेजस्वी यादव यांना संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीपासून लांब राहिलो. तेजस्वी यादव यांनी दिलेली लढत आणि त्यांना मिळालेले यश भविष्यात तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल, असे पवार यांनी सांगितले. मात्र, बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही, अशी कबुलीही शरद पवार यांनी दिली.

दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आज सकाळपासूनच चढउतार पाहायला मिळत आहेत. आज मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनने आघाडी घेतली होती. मात्र, अवघ्या दोन तासांत भाजपप्रणित एनडीएने जोरदार कमबॅक करत बहुमताच्या दिशेने वाटचाल सुरु केली होती. मात्र, आता संध्याकाळच्या वेळेत महागठबंधनच्या जागांमध्ये पुन्हा वाढ होताना दिसत आहे. मतमोजणी संथ असल्यामुळे अद्याप या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेले नाही.

फडणवीसांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा, बिहार भाजपची कृतज्ञता
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. सध्या येत असलेल्या कलानुसार भाजपने जोरदार मुसंडी मारलेली आहे. तिथे फडणवीसांच्या प्रचाराचा आम्हाला फायदा झाला, असं वक्तव्य बिहार (Bihar) भाजपचे प्रदेश प्रवक्ते संजय टायगर यांनी केले.

बिहार निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या, आक्रमक प्रचार केला. पक्षाची बाजू मांडली तसंच विरोधकांच्या चुकीच्या गोष्टींवर फडणवीसांनी बोट ठेवले. एकूणच प्रचार कार्यक्रमात फडणवीसांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या नियोजनाचा आणि अनुभवाचा आम्हाला मोठा फायदा झाल्याचे संजय टायगर यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेला छेद जाऊ देता कामा नये; बिहार निवडणुकीवर पवारांचं सूचक विधान

Bihar Election Result ! बिहार देवेंद्रजींनी आणले, महाराष्ट्रालाही फडणवीसच पाहिजे; नितेश राणेंचं ट्विट

शिवसेनेने महाराष्ट्रात हिसका दाखवलाय, त्यामुळे बिहारमध्ये भाजप शब्द फिरवणार नाही: राऊत

(Sharad Pawar on Bihar Election results 2020)