चंद्रकांत पाटलांनी कधी आंदोलन केलंय का, जेलमध्ये गेलेत का; जयसिंगराव गायकवाडांचा हल्लाबोल

| Updated on: Nov 29, 2020 | 4:22 PM

मी 15 वर्षे संघाचा प्रचारक होतो. आम्ही अनेक दिवस जेलमध्ये काढलेत. | Jaysingrao Gaikwad

चंद्रकांत पाटलांनी कधी आंदोलन केलंय का, जेलमध्ये गेलेत का; जयसिंगराव गायकवाडांचा हल्लाबोल
Follow us on

औरंगाबाद: भाजपला सोडचिठ्ठी देऊन नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या जयसिंगराव गायकवाड (Jaysingrao Gaikwad) यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी कधी आंदोलन केलेय का, त्यांना तुरुंग आणि पोलीस कस्टडी काय असते हे माहिती आहे का, असा सवाल जयसिंगराव गायकवाड यांनी विचारला. (Jaysingrao Gaikwad slams Chandrakant patil)

ते रविवारी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर चांगलीच आगपाखड केली. मी 15 वर्षे संघाचा प्रचारक होतो. आम्ही अनेक दिवस जेलमध्ये काढलेत. चंद्रकांत पाटील यांनी कधी आंदोलन केलंय का, त्यांना पोलीस कस्टडी माहिती आहे का, असे जयसिंगराव गायकवाड यांनी विचारले.

सध्या भाजपमध्ये सामूहिक नेतृत्त्वाची प्रथा संपुष्टात आली आहे. पक्षातील बहुजन नेतृत्त्व संपवण्याचा घाट घातला जात आहे. एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्यांना दाबण्याचा प्रयत्न झाला, असा आरोपही जयसिंगराव गायकवाड यांनी केला. आगामी काळात आपण मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी जीवाचे रान करु, असेही त्यांनी सांगितले.

‘जयसिंगराव गायकवाड जिंकणारा काठियावाडीचा घोडा’

जयसिंगराव गायकवाड हा जिंकणारा काठियावाडी घोडा आहे. माझ्यासारख्या राजकीय आखाड्यातील घोड्याला भाजपने 12 वर्षे खुंटीला बांधून ठेवले. तेव्हापासून मी अपमान सहन करत आहे. पूर्ण विचाराअंती मी पक्ष सोडला, असे जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.
महाविकासआघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या विजयासाठी 4000 पाणबुड्या अंडरग्राऊंड काम करत आहेत. भाजपमध्ये सध्या कोणतेही काम नियमानुसार होत नाही. आम्ही सांगू तो अध्यक्ष अशी भाजपची कार्यपद्धती असल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी म्हटले.

आम्ही विधान परिषदेच्या सहाच्या सहा जागा जिंकणार, कुणी पलायन केलं तरी पक्षाला फरक पडत नाही : चंद्रकांत पाटील

जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली होती. विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणूक आहे. तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, या सर्व जागा आम्ही जिंकणार. पक्षातून कुणी पलायन केलं तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

‘माझ्यासारख्या राजकीय आखाड्यातील घोड्याला 12 वर्षे खुंटीला बांधून ठेवलं’, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपवर हल्लाबोल

जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला रामराम, शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार

(Jaysingrao Gaikwad slams Chandrakant patil)