मी मरेपर्यंत ‘जय भीम’ म्हणणार : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Nov 30, 2019 | 8:37 PM

राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापुरुषांच्या उल्लेखावरुन भाजपने घेतलेल्या आक्षेपांचा जोरदार समाचार घेतला (NCP Leader Jitendra Awhad on oath controversy).

मी मरेपर्यंत जय भीम म्हणणार : जितेंद्र आव्हाड
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापुरुषांच्या उल्लेखावरुन भाजपने घेतलेल्या आक्षेपांचा जोरदार समाचार घेतला (NCP Leader Jitendra Awhad on oath controversy). माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांच्या नावासह इतर महापुरुषांच्या नावानं शपथ का घेतली हे विचारणं अत्यंत बालिश असल्याचं मत जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलं. तसेच मी मरेपर्यंत जय भीम म्हणणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं (NCP Leader Jitendra Awhad on oath controversy).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चार महापुरुषांची इतिहासात नावं कोरली गेली आहे. म्हणूनच त्यांच्याविषयी भाजपला असुया आहे. कारण भाजपचं इतिहासात योगदानच नाही. तिथेही त्यांनी पलायनवादाचीच भूमिका घेतली. मी मरेपर्यंत जय भीम म्हणणार आहे. मी त्या समाजातून येत नसलो, तरी जय भीम हे माझं उर्जास्त्रोत आहे. माझं उर्जास्थान शिवभीम आहे.”

भाजपच्या लोकांना संविधानाबद्दल कधीही प्रेम नाही. त्यांनी 1950 मध्ये संविधानावरच आक्षेप घेतला होता. त्यांना भारताचा राष्ट्रध्वज तिरंग्याबद्दल देखील प्रेम नाही. त्यांनी स्वतःच्या कार्यालयातही कधी तिरंगा लावला नाही. हे खरे कोण आहेत हा खरा इतिहास आता सांगण्याची वेळ आली आहे. आम्ही हा इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला सांगू, असंही जितेंद्र आव्हाड यांनी नमूद केलं.

“या महापुरुषांचं नाव नाही, तर मग काय हेगडेवारांचं नाव घ्यायचं का?”

जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर अनेक प्रश्नांच्या फैरी झाडल्या. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शिवाजी महाराज, डॉ. भीमराव आंबेडकर, शाहू महाराज, महात्मा फुले यांच्या नावानं शपथ का घेतली असा प्रश्न भाजप विचारत आहे. जर या महापुरुषांची नावं घ्यायची नाही, तर मग विधानभवनात त्यांचे पुतळे का उभे केले आहेत? हे पुतळे शोभेच्या वस्तू आहेत का? हे सर्व महापुरुष महाराष्ट्राचे आदर्श आहेत. त्यांनी हा महाराष्ट्र, हा देश, हे संविधान घडवलं. त्याचं नाव नाही घ्यायचं तर कुणाचं नाव घ्यायचं, हेगडेवारांचं नाव घ्यायचं का?”

“नाहीतर या मनुवाद्यांनी बायकांना घुंगटाच्या बाहेर येऊ दिलं नसतं”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “माझ्या आई बहिणी महात्मा फुलेंमुळे शिकत आहेत. ते जर नसते, तर या चातुवर्ण मानणाऱ्या मनुवाद्यांनी बायकांना घुंगटाच्या बाहेर येऊ दिलं नसतं. शाहु महाराजांनी समता शिकवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. शिवाजी महाराजांनी या मातीची ओळख दिली. त्या शिवाजी महाराजांचं पालन पोषन आणि संस्कार जिजाऊंनी केले. आयुष्यभर दगडगोटे खाऊनही सावित्री फुलेंनी शाळेत गेल्या, शिकल्या आणि बायकांनाही घराबाहेर काढत शिकवलं.”

“महापुरुषांची नावं घेतली म्हणून भाजपनं ज्या न्यायालयात जायचं तेथे जावं”

महापुरुषांची नावं घेतली म्हणून भाजपनं ज्या न्यायालयात जायचं त्या न्यायालयात जावं. सर्वोच्च न्यायालयच काय पण त्यांनी हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात देखील जावं. हे कसले न्यायालयात जातात, फक्त रडीचा डाव खेळत आहेत, असाही टोला जितेंद्र आव्हाड यांनी भाजपला लगावला.

“हे भाजपचे बालिश उद्योग”

भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरण्याच्या केलेल्या प्रयत्नावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “उद्धव ठाकरे लाख लाख लोकांच्या सभांना संबोधित करणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत. ते बाळासाहेबा ठाकरेंकडून बाळकडू घेऊन आले आहेत. भाजपच्या या कृत्यांनी कुणीही घाबरणार नाही. हे भाजपचे बालिश उद्योग आहेत.”