जय-वीरु पुन्हा एकत्र, प्रताप सरनाईकांसह एकाच मंचावर, आव्हाड म्हणतात “ये दोस्ती हम नही छोडेंगे”

| Updated on: Sep 16, 2020 | 3:00 PM

"आम्ही दूर गेलो होतो, असं लोकांना वाटत होतं, आम्ही जवळच होतो. नवरा-बायकोमध्येही वाद होत असतात" अशी मिष्कील प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

जय-वीरु पुन्हा एकत्र, प्रताप सरनाईकांसह एकाच मंचावर, आव्हाड म्हणतात ये दोस्ती हम नही छोडेंगे
Follow us on

ठाणे : महाविकास आघाडी आणि वर्तकनगर पोलिस वसाहतीमुळे दोन जुने राजकारणी मित्र एकत्र आले. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तसेच शिवसेनेचे धडाडीचे आमदार प्रताप सरनाईक एकाच मंचावर पाहायला मिळाले. (NCP Minister Jitendra Awhad and Shivsena MLA Pratap Sarnaik shares dais in Thane)

“आम्ही दूर गेलो होतो, असं लोकांना वाटत होतं, आम्ही जवळच होतो. नवरा-बायकोमध्येही वाद होत असतात. त्याच्यात काय मोठं. ये दोस्ती हम नही छोडेंगे” अशी मिष्कील प्रतिक्रिया मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

“माझ्या पत्राची दाखल घेत जितेंद्र आव्हाड यांनी पोलीस वसाहतीचा प्रश्न निकाली काढल्याने त्यांचे आभार. महाविकास आघाडीमध्ये किती वर्षांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आली. त्यामुळे आम्ही एकत्र होतो, आहोत आणि भविष्यातही राहू” असे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.

वर्तकनगर पोलिस वसाहतीचे पुनर्वसन प्रक्रिया प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने, तर गृहनिर्माण मंत्री यांच्या प्रयत्नाने होत आहे. म्हाडाकडून पोलिस इमारती बांधण्यात येणार आहेत. पोलिसांच्या कुटुंबियांना माफक दरात हॉल मिळेल, तसेच क्लब हाऊस बांधण्याचा मानसही सरनाईक यांनी व्यक्त केला.

1600 घरांपैकी 567 घरे पोलिसांसाठी राखीव असतील, तर उर्वरित घरे ही सोडतीवर असणार आहेत. म्हाडा 1100 घरे लॉटरी पद्धतीने विकेल, अशी माहिती जितेंद्र आव्हाड आणि प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत दिली.