पन्हाळ्यावर रोमँटिक गाणं का चित्रित केलंत? खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर ट्रोल

| Updated on: Sep 10, 2019 | 4:13 PM

पन्हाळा गडावर रोमँटिक गाणं चित्रित केल्याबद्दल राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे

पन्हाळ्यावर रोमँटिक गाणं का चित्रित केलंत? खासदार अमोल कोल्हे सोशल मीडियावर ट्रोल
Follow us on

मुंबई : भाजप सरकार महाराष्ट्रातील गडकिल्ले लग्नकार्य आणि हॉटेलसाठी भाड्याने देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आल्यानंतर टीकेची झोड उठवणारे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (NCP MP Dr Amol Kolhe trolled) सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. ‘मराठी टायगर्स’ चित्रपटातील ‘हुरहुर लागे श्वासांना’ हे गाणं पन्हाळा गडावर शूट झाल्याचं सांगत कोल्हेंनाच टीकेचं लक्ष्य (NCP MP Dr Amol Kolhe trolled) केलं जात आहे.

‘हुरहुर लागे श्वासांना’ या गाण्याचं चित्रिकरण पन्हाळा गडावर झाल्याचं सांगत नेटिझन्सनी डॉ. अमोल कोल्हेंसमोर प्रश्न उपस्थित केले आहेत. गड किल्ल्यांविषयी पुळका आहे, मग चार वर्षांपूर्वी गड किल्ल्यांवर या रोमँटिक गाण्याचं चित्रीकरण कसं केलंत? हा प्रश्न विचारला जात आहे.

कोल्हापुरातील पन्हाळा गडावर हे गाणं कधी शूट झालं? त्यावेळी अमोल कोल्हे कुठल्या पक्षात होते किंवा ते आता कुठल्या पक्षात आहेत, यापेक्षा त्यांनी पवित्र गड-किल्ल्यांवर अशी गाणं चित्रित करण योग्य आहे का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्याचं बोललं जात आहे.

‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमोल कोल्हे, आशिष विद्यार्थी, विक्रम गोखले, दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटे, तेजा देवकर, किरण शरद असे कलाकार होते. अवधूत कदम दिग्दर्शित या चित्रपटात बेळगाव सीमावादाचा प्रश्न हाताळण्यात आला होता.

अमोल कोल्हे काय म्हणाले होते?

‘जे औरंगजेबाला जमलं नाही ते महाराष्ट्र सरकारनं करून दाखवलं! केवळ संतापजनक! विकास हवा पण गडकोटांचं पावित्र्य राखूनच!’ असं मत डॉ. अमोल कोल्हेंनीही व्यक्त केलं होतं.

गडकिल्ल्याबाबत निर्णय काय?

पर्यटनासाठी गडकिल्ले भाड्याने देण्याच्या निर्णयावरुन (Forts of Maharashtra) झालेल्या टीकेनंतर, पर्यटन मंत्रालयाकडून याबाबतचं स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असं पर्यटन विभागाच्या सचिवांनी स्पष्ट केलं होतं.

“राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग 1 आणि दुसरे वर्ग 2. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग 1 मध्ये येतात आणि अन्य सुमारे 300 किल्ले हे वर्ग 2 मध्ये येतात.

…तेव्हा 40 पैशाचे लावारिस भक्त लगेच मेसेज करतात : अमोल कोल्हे

वर्ग 1 चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.

मात्र वर्ग 2 चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळं म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये”.

संबंधित बातम्या 

स्वराज्याचं तोरण बांधणाऱ्या किल्ल्यांमध्ये वेडिंग व्हेन्यूचं धोरण, 25 किल्ल्यांचं लवकरच विवाहस्थळात रुपांतर  

गडकिल्ले लग्न, समारंभासाठी भाड्याने नाहीत, पर्यटन विभागाचं स्पष्टीकरण, मंत्रिमंडळाचा नेमका निर्णय काय?