
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे, असा दावा दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख त्यांनी केला होता. परंतु आज मंत्रिमंडळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही जणांना शपथ दिली. म्हणजेच त्यांनी केलेले आरोप चुकीचे होते, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली.
आमच्या काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली. मी महाराष्ट्रातील तरुणांची बैठक घेतली होती. त्यावेळी काही प्रश्न उपस्थित केले होते. त्यावेळी काही जणांनी पक्षापासून वेगळी भूमिका घेतली. काही जणांची भूमिका दोन-तीन दिवसांत समोर येईल.
पक्षातील विधिमंडळाचे काही सदस्य यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली या संबंधिचं चित्र आणखी दोन-तीन दिवसात लोकांसमोर येईल. याचं कारण ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केले आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, असा खुलासा त्यांनी केलेला आहे. पण याबाबतीत मी आताच काही बोलू इच्छित नाही.
हा प्रकार इतरांना नवीन आहे. मला नवीन नाही. १९८६ साली निवडणुकीनंतर मी पाच लोकांचा नेता झाला होतो. त्या पाच लोकांच्या बळावर पुन्हा पक्ष बांधण्यास मी बाहेर पाडलो. १९८६ मध्ये जे पक्ष सोडून गेले, ते सर्व जण पराभूत झाले. मला राज्याच्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे.