स्थानिक राजकारणात भांड्याला भांड लागतं, समन्वयातून मार्ग काढू, राऊतांच्या इशाराऱ्यानंतर जयंत पाटलांचं उत्तर

| Updated on: Jun 04, 2021 | 6:37 PM

स्थानिक राजकारणात 3 पक्ष असल्यामुळे भांड्याला भांड लागणारच. आम्ही समन्वयातून मार्ग काढू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाधयक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय.

स्थानिक राजकारणात भांड्याला भांड लागतं, समन्वयातून मार्ग काढू, राऊतांच्या इशाराऱ्यानंतर जयंत पाटलांचं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि शिवसेना खासदार संजय राऊत
Follow us on

सुनील काळे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : खेड पंचायत समितीमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असं चित्र निर्माण झालं आहे. राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर आगपाखड करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अत्यंत कडक शब्दात राष्ट्रवादीला इशारा दिलाय. पालकमंत्री म्हणून अजित पवार यांनी दिलीप मोहिते पाटलांकडे लक्ष द्यावं, अन्यथा शिवसेना हा विषय सोडवायला समर्थ आहे, अशा शब्दात राऊतांनी दिलीप मोहिते-पाटलांवर आगपाखड केलीय. त्यावर स्थानिक राजकारणात 3 पक्ष असल्यामुळे भांड्याला भांड लागणारच. आम्ही समन्वयातून मार्ग काढू, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाधयक्ष जयंत पाटील यांनी म्हटलंय. (Jayant Patil responds to Sanjay Raut’s warning over Khed Panchayat Samiti dispute)

शिवसेनेचे विद्यमान सभापती भगवान पोखरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्या गटातील वाद आता थेट पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला आहे. या प्रकरणाची दखल घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज खेडमध्ये दाखल झाले. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावर निशाणा साधला. महाविकास आघाडीच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये चांगले संबंध आहेत. मात्र, खेडमध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून घाणेरडे राजकारण सुरु आहे, असा आरोप राऊतांनी केला. तसेच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानुसार खेडमध्ये आलो आहोत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या आमदाराला वेसण घालावे, असा सल्ला राऊत यांनी यावेळी दिलाय.

आम्ही चर्चेतून मार्ग काढू – जयंत पाटील

संजय राऊत यांच्या इशाऱ्याबाबत विचारलं असता, स्थानिक पातळीवर काही वाद झाला असेल तर समन्वयातून मार्ग काढू. कुठल्याही कार्यकर्त्यावर अन्याय होऊ देणार नाही. स्थानिक राजकारणात तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागतं, पण आम्ही चर्चेतून मार्ग काढू. संजय राऊत काय बोलले हे आपल्याला माहित नाही, असं उत्तर जयंत पाटील यांनी दिलंय. लॉकडाऊन हटवण्याच्या गोंधळाबाबतही जयंत पाटील यांना विचारलं. त्यावेळी त्यांनी विजय वडेट्टीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात नेमकं काय बोलणं झालं हे आपल्याला माहिती नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

“सरकारमधील पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. वरिष्ठ नेते कुठेही गालबोट लागू देत नाहीत. खेडमध्ये मात्र वारंवार घटना घडत आहेत. दोन-तीन पक्ष असल्यामुळे भांड्याला भांडं लागतं. अलिखित करार, एकमेकांची माणसं फोडून कुठेही सत्ता स्थापन करायची नाही, असं असेल तर दोन पक्षांनी महिती देऊन समन्वय साधावा”, असं संजय राऊत म्हणाले.

“लोक फोडून सत्ता स्थापन करायची हे खेडमध्ये घडले. पंचायत समितीच्या जागेबाबत हा वाद आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराने घाणेरडं राजकारण केले. खेडचे विद्यमान आमदार हे शरद पवारांच्या पक्षात राजकारण करण्यासाठी लायक नाहीत. पंचायत समितीच्या जागेवरून आमदार राजकारण करत आहेत, ते परंपरेला धरून नाही. अजितदादांना सांगून सुद्धा हे रेटून नेत असतील तर ह्याला माज आला, असं म्हणतात. पंचायत समितीच्या सदस्यांना पैशांच्या अमिषाने पळवून नेले. हा विषय लवकरच आम्ही त्यांच्या प्रमुखांना कळवू”, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

“पंचायत समितीचा विषय प्रतिष्ठेचा केला आहे. आम्ही देखील फोडाफोडी करू शकतो. आमदार दिलीप मोहिते यांची वागण्याची पद्धत हीच राहिली तर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहू अगर नको राहू पुढच्या वेळी शिवसेनाच आमदार असेल. महाराष्ट्रात सगळीकडे सुरळीत सुरू असताना असं खेड तालुक्यात कुरघोडी होत असेल तर पालकमंत्री यांनी विचार करावा”, असंही राऊत यावेळी म्हणाले.

संबंधित बातम्या :

वळसे पाटील आमचेही गृहमंत्री, मग राष्ट्रवादी आमदारपुत्र आणि शिवसैनिकांना वेगळा न्याय का? राऊत कडाडले

राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंना नेमका कसला माज? महाविकास आघाडी असो की नसो, त्यांना पाडणार : संजय राऊत

Jayant Patil responds to Sanjay Raut’s warning over Khed Panchayat Samiti dispute