राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न

| Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. युत्या-आघाड्यांची मोर्चेबांधणीही सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाहीय. महाराष्ट्रात तर नवं राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीच्या गोटात सामील होऊ शकते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या कोट्यातून मनसेला देण्याबाबत चर्चाही सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी […]

राज ठाकरेंसाठी राष्ट्रवादीची फिल्डिंग, आघाडीत घेण्याचे जोरदार प्रयत्न
Follow us on

मुंबई : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसे राजकीय घडामोडींनाही वेग आला आहे. युत्या-आघाड्यांची मोर्चेबांधणीही सुरु झाली आहे. महाराष्ट्रातही वेगळी स्थिती नाहीय. महाराष्ट्रात तर नवं राजकीय समीकरण पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आघाडीच्या गोटात सामील होऊ शकते. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ आघाडीच्या कोट्यातून मनसेला देण्याबाबत चर्चाही सुरु झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी करुन येत्या लोकसभा निवडणुकींना सामोरं जाणार आहेत, हे एव्हाना निश्चित झाले आहे. या आघाडीत आता इतर मित्रपक्ष जोडण्यासही सुरुवात झाल्याचे दिसते आहे. त्यातूनच राज ठाकरे यांच्या मनसेचा पर्याय पुढे येत आहे.

मनसेला आघाडीच्या कोट्यातून मुंबईत  लोकसभेसाठी एक जागा देण्याची चर्चा सुरु झाली आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा मनसेला द्यावी आणि इतर ठिकाणी त्यांची मदत घ्यावी, असा प्रस्ताव राष्ट्रवादीने काँग्रेसपुढे ठेवला आहे. मात्र, या प्रस्तावाला काँग्रेसने नकार दिला आहे.

मनसेला सोबत घेण्यास काँग्रेसचा विरोध का?

उत्तर भारतीयांचा कट्टर विरोधक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ओळख आहे. त्यामुळे मनसेला सोबत घेतल्यास काँग्रेसला देशातील हिंदी पट्ट्यात मोठा फटका बसू शकतो. विशेषत: उत्तर प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यांमधील जनतेच्या रोषाला काँग्रेसला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे काँग्रेसने मनसेला सोबत घेण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला विरोध केला आहे.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या काय स्थिती आहे?

मुंबईतल्या सहा मतदारसंघामध्ये ईशान्य मुंबई मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहिलाय. या मतदारसंघाने कायम वेगवेगळे निकाल दिले असून यावेळी धक्कादायक निकालाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. युतीमध्ये हा मतदारसंघ भाजपच्या वाट्या आला असून किरीट सोमय्या इथून भाजपचे खासदार आहेत. तर आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटील यांनी लढवून जिंकला होता. विशेष म्हणजे यापूर्वी या मतदारसंघातून काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत तीनवेळा लोकसभेवर गेलेत. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्याला आला.

वाचा : ईशान्य मुंबई लोकसभा : किरीट सोमय्यांना यंदा शिवसेनेचंच आव्हान

ईशान्य मुंबईमध्ये सलग दोनवेळा कोणीही निवडून आलं नसून प्रमोद महाजनांसारख्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. ईशान्य मुंबईचा भाग मिश्र मतदारांचा असून मराठी, गुजराती, दलित, उत्तरभारतीयांसारखे सर्व मतदार यात आहेत. हे समीकरण ज्या पक्षाला जास्त चांगलं जमवता येईल त्याचा विजय निश्चित आहे. गेल्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आपकडून ही निवडणूक लढवली होती पण मोदी लाटेसमोर त्यांचा टिकाव लागला नाही. पण आता समीकरणं बदलली असून भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी कायम शिवसेना नेतृत्वाला टीकेचं लक्ष केल्याने निवडणुकीच्या माध्यमातून ती खदखद बाहेर येण्याची शक्यता आहे.

मुलुंडपासून मानखुर्दपर्यंत हा मतदारसंघ पसरलेला असून 2009 च्या निवडणुकीत सोमय्या यांचा फक्त 2 हजार 399 मतांनी पराभव झाला होता. पण 2014 च्या निवडणुकीत त्यांनी तब्बल 5 लाख 25 हजार 285 मते मिळवून संजय पाटील यांच्यावर मात केली. ईशान्य मुंबईतल्या एकूण सहा आमदारांपैकी तीन आमदार भाजपचे आहेत, तर शिवसेनेचे दोन आणि समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे. त्यात मुलुंड पूर्व, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी, घाटकोपर पश्चिम ही मराठी वस्ती असलेले भाग आहेत. त्यावर आधी शिवसेनेची एकहाती सत्ता होती, पण मनसेच्या पक्ष स्थापनेनंतर हा भाग राज ठाकरेंच्या पाठीशी उभा राहिला.