नऊ वेळा काँग्रेस खासदार माणिकराव गावितांची कन्या शिवसेनेत, पुत्र भाजपच्या वाटेवर

| Updated on: Aug 20, 2019 | 1:01 PM

काँग्रेसकडून नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांच्या कुटुंबाने बंडाचं निशाण फडकावलं आहे. त्यांचे पुत्र भरत गावित भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. तर कन्या निर्मला गावित शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत

नऊ वेळा काँग्रेस खासदार माणिकराव गावितांची कन्या शिवसेनेत, पुत्र भाजपच्या वाटेवर
Follow us on

नंदुरबार : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षाला गळती लागल्यामुळे राज्यात राष्ट्रवादी-काँग्रेसची डोकेदुखी वाढलेली दिसत आहे. नंदुरबार (Nandurbar) लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस हे एक समीकरण होतं. मात्र नंदुरबारमधून सलग नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचे सुपुत्र भरत गावित (Bharat Gavit) कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. गावित यांच्या कन्या निर्मला गावितही (Nirmala Gavit) उद्या शिवबंधन हाती बांधणार आहेत.

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये 2014 च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता. 2019 मध्ये भरत गावित यांनी आपल्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसने के. सी. पाडवी यांना तिकीट दिल्याने भरत गावित बंडखोरीच्या तयारीत होते. अखेर बंड शमलं, पण लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदार हीना गावितच दुसऱ्यांदा निवडून आल्या. त्यानंतर भरत गावित यांनाही भाजपप्रवेशाचे वेध लागले आहेत.

52 वर्षे खासदारकी करत असताना माणिकराव गावित यांनी निभावलेली पक्षनिष्ठा आणि सर्व घटकांशी प्रेमभाव जपून मतदारसंघाशी बांधलेली घट्ट नाळ लक्षात घेता त्यांचे समर्थन करणारा भलामोठा कार्यकर्ता वर्ग आहे. पक्षाने माणिकराव गावित यांच्याऐवजी भरत गावित यांना उमेदवारी देऊन त्यांच्या या निष्ठेला आणि कार्याला न्याय दिला पाहिजे होता, अशी भावना या कार्यकर्त्यांमध्ये होती. अखेर त्यांच्या कन्येने शिवसेनेची, तर पुत्राने भाजपची वाट धरली आहे.

भरत गावित यांच्या परिवाराचा काँग्रेसमधील प्रवास

भरत गावित जिल्हा परिषद सदस्य आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे अडीच वर्ष अध्यक्ष

वडील माणिकराव होडल्या गावित – सलग 9 वेळा नंदुरबार मतदारसंघात काँग्रेसचे खासदार, दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री, लोकसभेचे हंगामी अध्यक्ष

बहीण निर्मला गावित – नाशिकमधील इगतपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या विद्यमान आमदार आहेत. 2009 आणि 2014 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता