धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार
कॉकरोच जनता पार्टीचं आज दिल्लीच्या जंतरमंतरवर जोरदार आंदोलन झालं. या आंदोलनात देशभरातील तरुणांनी सहभाग घेतला होता. तरुणांनी संसदेच्या दिशेने कूच केल्यानंतर आंदोलन अधिकच चिघळलं.

कॉकरोच जनता पार्टीचं दिल्लीच्या जंतरमंतरवर आज दिवसभर जोरदार आंदोलन झालं. संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी कॉकरोच जनता पार्टीने उग्र आंदोलन केलं. तरुणांनी संसदेकडे कूच करताच पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. त्यानंतर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे आणखीनच तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. संध्याकाळपर्यंत जंतरमंतर मैदान खाली झालं. त्यानंतर अभिजीत दीपके यांनी पुन्हा जंतरमंतरवर जाऊन आंदोलन धरणे आंदोलन सुरू केलं. जंतरमंतरवर अजूनही आंदोलन सुरू आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही, असा पवित्राच आंदोलकांनी घेतल्याने वातावरण पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जंतरमंतरवर शेकडो तरुण टॉर्च घेऊन ठाण मांडून बसले आहेत. या आंदोलकांना सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी संबोधित केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देईपर्यंत आम्ही जंतरमंतर सोडणार नाही. आम्ही येथे ठामपणे उभे आहोत आणि अधिक आंदोलक आमच्यात सहभागी होण्याची वाट पाहत आहोत, असे सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले.
मैदानात या…
अनेक लोक आसपास आहेत. सर्वांना आवाहन करतो तुम्ही सर्वांनी या ठिकाणी या. जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत आपल्याला मैदान सोडायचं नाहीये, असं आशुतोष रांका यांनी सांगितलं. तसेच हे आंदोलन सातत्याने चालू राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. हे आंदोलक रात्रभर जंतरमंतरवर राहणार आहेत. त्यामुळे सकाळी ते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सकाळी आंदोलक पुन्हा आंदोलन करणार की नाही? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आंदोलन चिघळलं
दरम्यान, आज दिवसभर जंतरमंतरवर मोठा हंगामा झाला. आंदोलकांनी संसदेच्या दिशेने कूच केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला. त्यामुळे वातावरण चिघळलं. आंदोलक बॅरिकेड्स तोडून पुढे सरकण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
