‘बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, नितेश राणेंना उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

| Updated on: Oct 16, 2021 | 1:42 PM

'बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नव्हते. मात्र, कालच्या भाषणात प्रत्येक वाक्यात खोटारडेपणा होता. बाळासाहेब असते तर सगळ्यात आधी यांनाच हाकलून दिलं असतं', अशी खोचक टीका नितेश राणेंनी केलीय.

बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं, नितेश राणेंना उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
नितेश राणे, उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई : दसरा मेळाल्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केलीय. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आता भाजप आमदार नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ‘बाळासाहेबांना खोटं बोलणारे आवडत नव्हते. मात्र, कालच्या भाषणात प्रत्येक वाक्यात खोटारडेपणा होता. बाळासाहेब असते तर सगळ्यात आधी यांनाच हाकलून दिलं असतं’, अशी खोचक टीका नितेश राणेंनी केलीय. (Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena)

नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका करताना तुम्हाला पहिल्यापासूनच मुख्यमंत्री व्हायचं होतं, म्हणूनच तुम्ही पूजापाठ केले. राजसाहेब, राणेसाहेबांना षडयंत्र करुन बाहेर केलं. रावते, शिंदेंसारख्या कडवट शिवसैनिकांना माझं आवाहन आहे. मी लहान आहे. पण तुम्हाला कधीच संधी मिळणार नाही. ठाकरे परिवार सोडून एकजणही मुख्यमंत्री होणार नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांच्याशिवाय कुणीही कधी मुख्यमंत्री होणार नाही, असा दावाही नितेश राणेंनी केलाय.

‘उद्धव ठाकरेंचं कालचं भाषण महाराष्ट्रासाठी धोका’

1993 ला शिवसेनेत तरी होते का हे? हे तर फोटो काढत फिरत होते. राजसाहेब, राणेसाहेब त्यावेळी शिवसेनेत होते. एकनाथ शिंदेंनी विचार करावा. उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी धोका आहे. बंगाल पॅटर्नमध्ये 40 हजार हिंदू मारले गेले, तिथे हिंदुत्वाची व्याख्या सांगणार का? असा सवाल नितेश राणे यांनी केलाय. कालच्या भाषणानंतर हिंदू खतरे मे है. त्यासाठी मुख्यमंत्री जबाबदार असतील, असंही नितेश राणे म्हणाले.

फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

एकेकाळी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला विचारांचं सोनं लुटले जायचं, पण काल मुख्यमंत्र्यांना गरळ ओकताना बघितलं, अशी घणाघाती टीकेने फडणवीसांनी पत्रकार परिषदेची सुरुवात केली. भाजपला जनतेने नाकारलं नाही. आम्ही जेवढ्या जागा लढलो त्यापैकी 70 टक्के जागा जिंकलो. आम्हाला जनतेने नाकारलं नाही. तुम्ही बेईमानीने सरकार बनवलं. आताचं तयार झालेलं सरकार हे बेईमानीने बनलेलं आहे, असा घणाघाती हल्ला फडणवीसांनी केला.

‘उद्धवजी, तुम्हाला उमेदवार नव्हता, आम्ही दिला’!

उद्धव ठाकरे यांनी सारखा ‘सरकार पाडून दाखवा, पाडून दाखवा’ चा धोशा का लावला आहे. मीच तुम्हाला आव्हान देतो की, तुम्ही एकदा सरकार चालून तर दाखवा, कामं करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना मदत करुन तर दाखवा, शेतकऱ्यांना दिलासा देऊन तर दाखवा, असे फडणवीस यांनी म्हटले. उद्धव ठाकरे भाजपला उपऱ्यांचा पक्ष म्हणून हिणवतात. पण त्यांच्या पक्षाची अवस्था काय आहे. अनेकदा शिवसेनेकडे उमेदवार नव्हता तेव्हा भाजपने त्यांना उमेदवार दिल्याची आठवण देवेंद्र फडणवीस यांनी करुन दिली.

इतर बातम्या :

VIDEO: मोदींकडून एजन्सींचा गैरवापर नाहीच, तर तुमचं अर्ध मंत्रिमंडळ तुरुंगात असतं; फडणवीसांचा हल्लाबोल

भाजपवर काहीही बोला, पण संघ पद्धतीवर नख लावण्याचं काम केलं तर खपवून घेणार नाही : आशिष शेलार

Nitesh Rane criticizes CM Uddhav Thackeray and Shivsena